
यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातून मागील सहा महिन्यांत तब्बल ३४ आदिवासी मुली बेपत्ता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे.
मानवी तस्करीचा संशय, राजकीय आरोप-प्रत्यारोप-
भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रफुल चव्हाण यांनी या प्रकरणात मोठा आरोप करत मुलींची मानवी तस्करी होत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. त्यांनी दावा केला आहे की, काही ऑडिओ क्लिपमध्ये तस्करीच्या पद्धतींबाबत माहिती असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांवर हलगर्जीपणाचा ठपका
चव्हाण यांनी पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर- प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणातील मुख्य आरोपी मजहर कुरेशी याला यापूर्वी ताब्यात घेऊन सोडण्यात आले होते. त्यानंतर तो तेलंगणा येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. मात्र, नंतर त्याला पुन्हा अटक करण्यात आली.
“लव्ह जिहाद” आणि धर्मांतरणाचा अँगल?
या प्रकरणात “लव्ह जिहाद” आणि धर्मांतरणाचा अँगलही असू शकतो, अशी शक्यता व्यक्त करत सखोल चौकशीची मागणी करण्यात आली आहे. तसेच, मुलींना व त्यांच्या कुटुंबियांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
कारवाईची मागणी-
-आरोपीला मदत करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी
-तपास स्वतंत्र यंत्रणेकडे द्यावा
-बेपत्ता मुलींचा तातडीने शोध घ्यावा
या संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्य सरकारलाही देण्यात आली असून, सखोल तपासाची मागणी जोर धरत आहे.
सध्या या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, पोलिस तपासातून नेमके काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.








