Published On : Mon, Jul 22nd, 2019

पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी जनजागृती आवश्यक : महापौर नंदा जिचकार

Advertisement

स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्‌घाटन

नागपूर, : नागपूर शहरात वाहतुकीच्या माध्यमातून होणारे कार्बन उत्सर्जन रोखण्यासाठी धोरण आखणाऱ्यांनी आणि शहर विकासाचे नियोजन करणाऱ्या यंत्रणेने पर्यावरणपूरक वाहतुकीला अधिकाधिक प्रोत्साहन द्यावे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करावी, असे प्रतिपादन महापौर नंदा जिचकार यांनी केले.

नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, एएफडी, युरोपियन युनियनच्या मोबीलाईज युवर सिटी या उपक्रमाच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक तुली इम्पेरियल येथे आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्‌घाटन सोमवारी (ता. २२) झाले. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर एनएसएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे, अर्बन मास ट्रान्सीट कंपनी लि.चे तज्ज्ञ अजय कुमार, ए.एफ.डी.चे रजनीश आहुजा, नागरी वाहतुकीतील तज्ज्ञ एस. रामकृष्णन उपस्थित होते.

पुढे बोलताना महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, नागपूर शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत काही चांगले उपक्रम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राबविण्यात येत आहेत. शहरात सार्वजनिक वाहतूक नागरिकांना परवडेल अशा किमतीत उपलब्ध करून देण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतुकीच्या बाबतीत केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून जे उपक्रम हाती घेण्यात येत आहेत, त्या माहिती यंत्रणेने अशासकीय संस्था आणि नागरिकांपर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी बोलताना एनएसएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रामनाथ सोनवणे म्हणाले, युरोपियन युनियनच्या ‘मोबीलाईज युवर सिटी’ या उपक्रमांतर्गत नागपूर शहराची निवड करण्यात आली आहे. नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. ते म्हणाले, नागरिक आता वाढत्या प्रदूषणाबाबत जागरुक झाले आहे. बदल स्वीकारण्याची नागरिकांची तयारी आहे. पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी केंद्र सरकार स्वत: पुढाकार घेत आहे. भविष्यात पेट्रोल, डिझेलसारख्या इंधनावर चालणारे वाहने इतिहासजमा होतील. पाश्चिमात्य देशांनी पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने जुन्या वाहनांमध्ये बदल केला आहे. शहराचे नियोजन करणाऱ्या यंत्रणेने इको-फ्रेन्डली पर्यावरणाच्या दृष्टीने दूत बनावे आणि नागरिकांमध्ये जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

अर्बन मास ट्रान्सीट कंपनी लिमिटेडचे तज्ज्ञ अजय कुमार यांनी नागरिकांनी खासगी वाहने वापरू नये यासाठी अधिकाऱ्यांना नागरिकांना प्रोत्साहित करावे, असे आवाहन केले. शहरात वाहनांची संख्या वाढत आहे. जी नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक असल्याचे त्यांनी सांगितले.

एस. रामकृष्णन म्हणाले, नागपूर शहर सार्वजनिक वाहतुकीचे नियोजन करण्यात अग्रेसर आहे. नागपुरात सध्या केवळ नऊ टक्के नागरिकच सार्वजनिक वाहतुकीचा वापर करतात असे म्हणत सार्वजनिक वाहतुकीचे एकत्रिकरण करण्याची गरज बोलून दाखविली.

यावेळी व्हीएनआयटीचे डॉ. उदित आणि डॉ. अंकित कठुरिया यांनी ‘इंटरसेक्शन ऑफ रोडस्‌’ यावर सादरीकरण केले. महामेट्रोचे सहायक महाव्यवस्थापक (वाहतूक) महेश गुप्ता यांनी महामेट्रोच्या मल्टीमोडल इंटिग्रेशन मॉडेलचे सादरीकरण केले. ग्रँण्ड थॉरर्टनचे प्रकल्प संचालक अरुण कुमार यांनी स्मार्ट सिटी उपक्रम आणि स्मार्ट ॲण्ड ग्रीन फ्युअल ट्रान्सपोर्टबाबत सविस्तर माहिती दिली.

यावेळी एएफडीच्या नागरी वाहतुकीचे प्रकल्प व्यवस्थापक रजनिश आहुजा, ए.एफ.डी.चे ग्रॅन्ट मॅनेजर जतीन अरोरा, स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.चे उपकार्यकारी अधिकारी महेश मोरोणे, विजय बनगीरवार, राजेश दुफारे, देवेंद्र महाजन, उदय घिये, लिना बुधे, कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, सुभाष सिंगला उपस्थित होते. मोबीलाईज युवर सिटीचे राष्ट्रीय समन्वयक जयश्री जिंदल आणि नागपूर शहर समन्वयक निवेश मोदी यांनी कार्यशाळेच्या यशस्वीतकरिता सहकार्य केले.