Published On : Thu, May 14th, 2026
By Nagpur Today Nagpur News

NEET परीक्षा रद्द प्रकरणावर राज ठाकरेंचा संताप; २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचं काय?

मुंबई : NEET-UG २०२६ परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणामुळे राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) कडून परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण व्यवस्थेवर जोरदार टीका केली आहे. “२२ लाख विद्यार्थ्यांचं आणि त्यांच्या कुटुंबीयांचं आयुष्य टांगणीला लागलं, त्याची जबाबदारी कोण घेणार?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

सोशल मीडियावरून प्रतिक्रिया देताना राज ठाकरे यांनी NEET परीक्षेच्या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “केंद्र सरकार प्रत्येक विषयात गोंधळ घालून सामान्यांना वेठीस धरण्याचं काम करत आहे. NEET पेपरफुटीमुळे पुन्हा एकदा शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत,” असे त्यांनी म्हटले.

Gold Rate
May 14- 2026 - Time 10.30Hrs
Gold 24 KT ₹ 1,63,000 /-
Gold 22 KT ₹ 1,51,600 /-
Silver/Kg ₹ 2,92,400/-
Platinum ₹ 88,000/-
Recommended rate for Nagpur sarafa Making charges minimum 13% and above

राज ठाकरे यांनी दावा केला की, लाखो रुपये घेऊन प्रश्नपत्रिका विकल्या जात असल्याच्या चर्चा समोर येत आहेत आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये कोचिंग क्लासेसचाही सहभाग असल्याची शंका व्यक्त केली. “सीबीआय चौकशी लावून सरकार आपली जबाबदारी संपली अशा आविर्भावात आहे. पण विद्यार्थ्यांच्या मानसिक तणावाचं काय?” असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

Raj Thackeray यांनी २०१६ पासून NEET परीक्षेला विरोध करत असल्याचे सांगितले. “एकच राष्ट्रीय परीक्षा लागू केल्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम विद्यार्थ्यांना फायदा होतो, तर सामान्य कुटुंबातील मुलं स्पर्धेत मागे पडतात. महागडे कोचिंग क्लासेस आणि व्यवस्थेवर प्रभाव टाकणाऱ्या लोकांमुळे गुणवत्तेवर परिणाम होत आहे,” अशी टीकाही त्यांनी केली.

दक्षिण भारतीय राज्यांनीही NEET ला विरोध केला असल्याचा उल्लेख करत त्यांनी महाराष्ट्र सरकारलाही भूमिका स्पष्ट करण्याचे आवाहन केले. “महाराष्ट्रातील मेडिकल कॉलेजमध्ये मराठी विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळत नसेल तर मग राज्य सरकारचा उपयोग काय?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावरही त्यांनी निशाणा साधला. “NEET मध्ये वारंवार गोंधळ होत असतानाही शिक्षण मंत्र्यांवर कोणतीच कारवाई होत नाही. २२ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या मंत्र्यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा,” अशी मागणी त्यांनी पंतप्रधानांकडे केली.

यासोबतच पेट्रोल-डिझेल बचतीच्या सरकारी उपक्रमांवरही त्यांनी अप्रत्यक्ष टीका केली. “फोटोसेशनपुरत्या उपक्रमांमधून बाहेर पडून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर ठोस भूमिका घ्या,” असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला.

Advertisement
GET YOUR OWN WEBSITE
FOR ₹9,999
Domain & Hosting FREE for 1 Year
No Hidden Charges
Advertisement
Advertisement