
मुंबई : महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसाचे सावट गडद झाले असून गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची चिंता वाढली आहे. दोन प्रत्यावर्ती चक्रीय वातस्थितीमुळे तयार झालेल्या वातावरणामुळे राज्यात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
गुढीपाडव्याच्या दिवशी मुंबईत हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्याचबरोबर ठाणे आणि पालघर परिसरातही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याने सणाच्या शोभायात्रांवर पावसाचे सावट राहणार आहे.
तापमानात घट, आर्द्रतेत वाढ-
अवकाळी वातावरणामुळे राज्यातील तापमानात काहीशी घट झाली आहे. मुंबईत कमाल तापमानात घसरण झाली असली तरी आर्द्रतेमुळे किमान तापमान मात्र वाढलेले आहे. त्यामुळे उकाड्याची भावना कायम आहे.
कोकणातही पावसाची हजेरी-
कोकणात सुरुवातीला कोरडे वातावरण राहण्याचा अंदाज असला तरी त्यानंतर पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून विजांच्या कडकडाटासह वाऱ्यांचा वेग वाढण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्गात हलक्या सरींचा अंदाज आहे.
विदर्भ- मराठवाडा सतर्कतेवर-
गुढीपाडव्याच्या दिवशी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. विदर्भात काही ठिकाणी आधीच मेघगर्जनेसह पावसाची नोंद होत आहे.
मराठवाड्यातील परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि कोल्हापूर येथेही पावसाची शक्यता आहे.
पुणे, सातारा, सांगली आणि अहिल्यानगर या भागांत बुधवार-गुरुवारी मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असून सोलापूरमध्ये सलग तीन दिवस पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
सणावर पावसाचे सावट-
गुढीपाडव्याच्या उत्साहावर यंदा अवकाळी पावसाचे सावट असल्याचे चित्र आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.








