Published On : Fri, Mar 26th, 2021

हळदी कार्यक्रमात ५० पेक्षा अधिक लोक असल्याने केली दंडात्मक कारवाई

Advertisement

कार्यक्रमात लोकांची संख्या जास्त असल्यास होणार दंडात्मक कारवाई- उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कटयारे


रामटेक– महाराष्ट्रात तसेच नागपूर जिल्हात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाचे आदेश दि.१५ ०३.२०२१ व जिल्हाधिकारी, नागपूर यांचे आदेशानुसार लग्न समारंभ व तत्सम कार्यक्रम ५० व्यक्तीच्या उपस्थितीत करण्याची मर्यादा घालण्यात आलेली आहे.

या आदेशाचे उल्लंधन करत बंडू तुलाराम धमगाये, शितलवाडी यांचे घरी आयोजीत केलेल्या हळदी समारंभात ५० पेक्षा जास्त व्यक्तींचे उपस्थितीत, कोव्हिड -१९ बाबत कोणत्याही नियमांचे पालन न करता डी. जे. रात्री उशिरापर्यंत सुरू होता. सदर समारंभ सुरू करतांना उपविभागीय अधिकारी, जोगेद्र कटयारे यांचे मार्गदर्शनाखाली तहसीलदार बाळासाहेब म्हस्के , सहाय्यक पोलीस निरीक्षक कोळेकर , राऊत , मंडळ अधिकारी जांभुळे व तलाठी ठाकूर यांचे पथकाने कारवाई केली व डी. जे. जप्त करण्यात आला .

सदर कार्यक्रमाचे आयोजक बंडू तुकाराम धमगाये व डी. जे. मालक यश चांदुजी जत्रे यांचे वर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१(बी) व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ व २६९ अन्वये पोलीस स्टेशन, येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आयोजक बंडू तुकाराम धमगाये यांना रुपये १० ,००० /- दंड ठोठावण्यात आला. तशेच डी. जे. मालक यश चांदुजी जत्रे यांनी परवानगी शिवाय रात्री उशिरापर्यंत डी. जे. वाजवून ५० पेक्षा जास्त व्यक्तीचा जमाव करून जिल्हाधिकारी, नागपूर यांचे आदेशांचे उल्लंघन केल्याबद्दल रुपये २५,०००/- (पंचवीस हजार रुपये) दंड ठोठावण्यात आला.

तशेच विक्रम रामदास पडोळे , परसोडा यांचे घरी आयोजित केलेला लग्न स्वागत समारंभामध्ये ५० पेक्षा जास्त व्यक्तींचे उपस्थितीत असल्याने तशेच विना मास्क व्यक्ती आढळल्यामुळे आयोजक विक्रम रामदास पडोळे यांना रु. १०,०००/- दंड ठोठावण्यात आला .

रामटेक तालुक्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की , कोणतेही लग्न समारंभ व तत्सम कार्यक्रम आयोजित केल्यास सदर कार्यक्रमामध्ये कोव्हिडं-१९ चा संसर्ग व प्रसार टाळण्याचा दृष्टीने जिल्हाधिकारी , नागपूर यांनी दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा दंडात्मक वा फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे उपविभागीय अधिकारी जोगेंद्र कट्यारे यांनी सांगितले.