Published On : Wed, Jul 18th, 2018

लोकराज्यच्या ‘वारी’ विशेषांकाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Advertisement

नागपूर : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या लोकराज्यच्या ‘आषाढी वारी’ विशेषांकाचे आज विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

यावेळी महसूलमंत्री तथा या विशेषांकाचे अतिथी संपादक चंद्रकांत पाटील, नागपूरचे विभागीय आयुक्त अनुप कुमार, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे सचिव तथा महासंचालक ब्रिजेश सिंह, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल आदी उपस्थित होते.

आषाढी वारीचा संग्राह्य विशेषांक
पंढरपूरची आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक वैभवाचा सर्वश्रेष्ठ आविष्कार आहे. यंदाच्या वारीत माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयामार्फत ‘संवादवारी’ हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना वारकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर लोकराज्यच्या या विशेषांकाचे आज प्रकाशन करण्यात आले.

या विशेषांकाचे अतिथी संपादक असलेल्या महसूलमंत्री श्री. पाटील यांनी ‘रंगले हे चित्त माझे विठुपायी’ असे म्हणत वारकऱ्यांसाठी संदेश दिला आहे. अंकामध्ये श्रीपाद अपराजित, डॉ. द. ता. भोसले, श्रीधरबुवा देहूकर, संदेश भंडारे, बाळासाहेब बोचरे, डॉ. यू. म. पठाण, प्रा. राम शेवाळकर, डॉ. प्रतिमा इंगोले, जयंत साळगावकर आदी मान्यवरांनी वारीच्या अनुषंगाने विविध विचार मांडले आहेत.

विठ्ठल-रुक्म‍िणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांनी समितीमार्फत भक्तांसाठी दिल्या जाणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली आहे. पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर आणि सोलापूर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पालखी मार्गावर तसेच पंढरपूर येथे प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या सोयी सुविधा तसेच उपाययोजनांची माहिती दिली आहे. राज्य शासनामार्फत आयोजित केल्या जाणाऱ्या स्वच्छतेच्या वारीसंदर्भातही विशेषांकात माहिती आहे.