Published On : Wed, Sep 22nd, 2021

पौर्णिमा दिवसानिमित्त मनपा-ग्रीन व्हिजिलतर्फे लक्ष्मीनगर चौकात जनजागृती

Advertisement

नागपूर: वीज बचतीसाठी नागपूर महानगरपालिकेने ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनच्या सहकार्याने व तत्कालीन महापौर अनिल सोले यांच्या नेतृत्वात सुरू केलेल्या पौर्णिमा दिवसाने आज चळवळीचे स्वरूप घेतले आहे. पौर्णिमा दिवसानिमित्त मंगळवारी (ता. २१) मनपा कर्मचारी व ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी लक्ष्मीनगर चौकात जनजागृती केली.

पौर्णिमा दिवसानिमित्त नागपूर महानगरपालिकेतर्फे रात्री किमान एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करण्यात येते. यासोबतच शहरातील एका परिसरात वीज बचतीबाबत जनजागृती करण्यात येते. मंगळवारी लक्ष्मीनगर चौकात जनजागृती करण्यात आली. या परिसरातील व्यापाऱ्यांना अनावश्यक वीज दिवे बंद करण्याचे आवाहन करीत ग्रीन व्हिजिलच्या स्वयंसेवकांनी पौर्णिमा दिवसामागील संकल्पना समजावून सांगितली.


महापौर दयाशंकर तिवारी, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात ग्रीन व्हिजिल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात टीम लीडर सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, शीतल चौधरी, श्रिया जोगे, बिष्णुदेव यादव, प्रयास जांगडे, तुषार देशमुख, गौरी श्रीखंडकर, तृप्ती बांगडकर आदिंनी व्यापारी व नागरिकांना त्यांच्या प्रतिष्ठान व घरातील वीज दिवे एक तासांकरिता बंद करण्याची विनंती केली. व्यापारी व नागरिकांनी स्वयंसेवकांच्या विनंतीला मान देत या उपक्रमात वीज दिवे बंद करून सहभाग नोंदवला. मनपाच्या वतीनेही काही पथदिवे बंद करण्यात आले होते. काही व्यापाऱ्यांनी प्रत्येक पौर्णिमेला रात्री एक तास अनावश्यक वीज दिवे बंद ठेवणार असल्याचे आश्वासन दिले.

यावेळी मनपा विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. एस. मानकर, कल्पना मेश्राम, जी.एम. तारापुरे उपस्थित होते.