Published On : Sat, Jun 29th, 2019

शेतकर्‍यांना पीक कर्ज उपलब्ध करून द्या : पालकमंत्री बावनकुळे

Advertisement

-विहिरगाव येथे जनसंवाद
-700 नागरिकांनी दिले पालकमंत्र्यांना निवेदन
-सर्व निवेदनांवर कारवाई होणार
-प्रधानमंत्री किसान सन्मान योजना सर्व शेतकर्‍यांसाठी

C Bawankule

नागपूर: ज्या शेतकर्‍यांना पीक कर्जाची आवश्यकता असेल, शेतकर्‍यांनी मागणी केली असल्यास त्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हा प्रशासनाअंतर्गत येत असलेल्या शासकीय विभागाच्या अधिकार्‍यांना दिले. पीक कर्जापासून शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

नागपूरजवळील विहिरगाव येथे पालकमंत्री बावनकुळे यांनी आज जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजित केला होता. या कार्यक्रमात 700 वर नागरिकांनी पालकमंत्र्यांना निवेदन देऊन समस्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयतन केला. याप्रसंगी नागपूर पंचायत समितीचे माजी सभापती अजय बोढारे, चंद्रशेखर राऊत, योगेश इरखेडे, रमेश तिडके, सविता बोरकर, सरपंच नरेश हिंगणे, अमोल परतेकी, श्री कापसे उपस्थित होते.

शेतकर्‍याचा पेरणीचा हंगाम सुरु झाला आहे. शेतकर्‍यांना पेरणीसाठी पीककर्जाची अडचण निर्माण होणार नाही यादृष्टीने प्रशासनाने सतर्क राहायचे आहे. कृषी विभागाच्या अधिकार्‍यांनी शेतकर्‍यांशी संपर्क ठेवून त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या कामात येणार्‍या अडचणी दूर कराव्या. ज्या बँका शेतकर्‍यांना मदत करणार नाही, त्यांची नोंद करून ठेवा. शेतकर्‍यांना लाभदायी ठरणार्‍या शासकीय योजनांचा वेळोवेळी लाभ त्यांना मिळाला पाहिजे, याकडेही पालकमंत्र्यांनी आपल्या भाषणातून लक्ष वेधले.

या शिबिरात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा पहिला हप्ता शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. उर्वरित दोन हप्ते जमा करण्यासाठी पासबुक आणि आधारकार्ड देण्याच्या सूचना देण्यात आल्या. ही योजना आता सर्वांसाठी खुली आहे. पूर्वी 2 हेक्टरपर्यंतच्या शेतकर्‍यांनाच या योजनेचा लाभ घेता येत होता. याप्रसंगी उज्जवला गॅस योजनेअंतर्गत अनेक महिलांना शेगडीचे वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच अंत्योदय रेशनकार्डचा वाटपही करण्यात आले. हुडकेश्वर-विहीरगाव या परिसरातील 1 लाख 22 हजार नागरिकांना ऑनलाईन अन्नधान्य वाटप करण्यात येत असल्याची माहितीही संबंधित विभागाने दिली.

तसेच प्रत्येक विभागाने आपल्या विभागामार्फत झालेल्या कामांची माहिती दिली. अपूर्ण कामे किती दिवसात पूर्ण करणार याची माहितीही नागरिकांना दिली. याशिवाय रस्ते, आरोग्य, शिक्षण, महिला बाल कल्याण, पाणीपुरवठा, वीज कनेक्शन या विभागांनीही आपापल्या कामांचा आढावा पालकमंत्री व नागरिकांसमोर यावेळी घेतला. या परिसरातील नागरिकांना भेडसावत असलेल्या काही समस्या नागरिकांनी याप्रसंगी मांडून पालकमंत्र्यांचे त्याकडे लक्ष वेधले. मोठ्या संख्येने नागरिकांना या जनसंवाद कार्यक्रमाला हजेरी लावली होती.