सातारा : काल पुण्याच्या कार्यक्रमात नितीन गडकरींनी मुख्यमंत्र्यांच्या नगर विकास खात्याचे वाभाडे काढल्यानंतर, काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपच्या अंतर्गत राजकारणावर कोटी केली आहे.
गडकरींना मुख्यमंत्री व्हायचं असल्यामुळं त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केल्याचं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. तसंच गडकरी मुख्यमंत्री झाल्यानं राज्यातले प्रश्न सुटणार असतील तर फेरबदल करायला काय हरकत आहे, असा बोचरा सवालही चव्हाणांनी उपस्थित केला आहे.
याशिवाय, पुणे-सातारा महामार्गाचं काम रखडवणाऱ्या रिलायन्स इन्फ्रा कंपनीवर चव्हाणांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेकांचे रिलायन्सशी संबंध असल्यामुळं कारवाई केली जात नसल्याचा आरोप चव्हाणांनी केला आहे.
राज्याचा शहर विकास विभाग फुकटाला महाग आहे, अशा शब्दात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री काल देवेंद्र फडणवीस सांभाळत असलेल्या खात्यावर टीका केली आहे. पुण्यातील चांदणी चौकातल्या नियोजित उड्डाणपुलाच्या भूमीपूजनानिमित्त बोलताना नितीन गडकरींनी ही टीका केली.
याशिवाय, ”पुण्याचा विकास हवा असेल, तर त्याचा आराखडा एखाद्या बाहेरच्या एजन्सीला सोबत घेऊन करुन घ्या, तरच पुण्याचा विकास शक्य आहे,” असं गडकरींनी म्हटलं होतं.