
अकोला – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी अकोल्यात पत्रकारांशी बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) आणि केंद्र सरकारवर कडाडून टीका केली. अलीकडे काढण्यात आलेल्या मोर्च्यानंतर पुढील आठवड्यात महत्त्वाची बैठक घेऊन पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
आंबेडकर म्हणाले की, जिल्हानिहाय मोर्चे आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, देशव्यापी आंदोलनाबाबतही पुढील आठवड्यात अंतिम भूमिका जाहीर केली जाणार आहे. या माध्यमातून संघ आणि सरकारच्या धोरणांविरोधात अधिक आक्रमक भूमिका घेतली जाईल, असे संकेत त्यांनी दिले.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलेल्या ‘देशात पुन्हा कोरोना संकट येऊ शकते’ या वक्तव्यावरही आंबेडकरांनी निशाणा साधला. “अशा प्रकारची वक्तव्ये करून भीतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. सरकार नेमके काय संदेश देऊ इच्छित आहे?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
तसेच, “पंतप्रधानांना हे एखाद्या वेड्यासारखे वाटत आहे,” अशा शब्दांत त्यांनी मोदींच्या विधानावर तीव्र प्रतिक्रिया नोंदवली.
प्रकाश आंबेडकर हे महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशन कौन्सिलच्या निवडणुकीसाठी मतदान करण्यासाठी अकोल्यात आले होते.









