Published On : Sat, Oct 27th, 2018

शिक्षणाच्‍या बळावरच सशक्‍त समाजनिर्मिती शक्‍य-नितीन गडकरी

Advertisement

नागपूर :‘ भविष्‍याच्या पीढीसंदर्भातील विचार हे तांत्रिक व वैज्ञानिक दृष्‍टीवर आधारित असले पाहिजे. गरीबी, बेरोजगारी या मूलभूत सामाजिक समस्‍यांवर मात करण्‍यसाठी सामाजिक आर्थिक परिवर्तन व शिक्षण हे महत्‍वाचे ठरते. यातूनच सशक्‍त समाजनिर्मिती करणे शक्‍य होईल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते व वाहतूक, महामार्ग, व केंद्रीय जलसंपदा मंत्री

श्री. नितीन गडकरी यांनी आज नागपूर येथे केले. स्‍थानिक ग्रेट नाग रोड स्थित हॉटेल तय्यब येथे ‘सूफीझम व मानवता आणि राष्‍ट्रनिर्माणामध्‍ये मूस्लिम समुदायाची भूमिका’ या विश्‍व इस्‍लामिक सुन्‍नी इज्तिमा प्रसंगी आयोजित परिसंवादात प्रमुख अतिथी म्‍हणून ते बोलत होते.याप्रसंगी महाराष्‍ट्राचे मुख्यमंत्री श्री.देवेद्र फडणवीस, सुफी विचारवंत डॉ. सैय्यद फजिउल्‍लाह चिस्‍ती प्रामुख्याने उपस्थित होते.

समाजातील ज्‍या घटकांपर्यंत ज्ञानाचा प्रकाश पोहचला नाही, ज्‍यांना शिक्षणाच्‍या प्रवाहात आणने हा आपल्‍या चिंतनाचा विषय असला पाहिजे. सुफी विचार हे मानवतेच्‍या आधारे समाजपरिवर्तनाचा पुरस्‍कार करतात. याच्‍या विरूद्ध काही आतंकवाद, दहशतवाद पसरविणा-या प्रवृत्‍ती समाजविघातक विचार मांडतात. सामाजिक लढाई ही अशा चांगल्‍या व वाईट दोन प्रवृत्‍तीमध्‍ये असते, असे विचार गडकरी यांनी यावेळी मांडले.

महाराष्‍ट्र शासनाने अल्‍पसंख्‍याक विभागातर्फे अल्‍पसंख्‍याक समाजाच्‍या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध पाऊले उचलली आहेत. 2014 पर्यंत विद्यार्थी वसतीगृहांची संख्‍या 5 होती ती 2018 पर्यंत 17 वर गेली असून 10 वसतीगृहांची बांधणी सुरू आहे. विद्यार्थ्‍यांसाठीची शिष्‍यवृत्‍तीची वार्षिक तरतूद 56 कोटी होती ती गत चार वर्षात 100 कोटी करण्‍यात आली आहे. खाजगी अभियांत्रिकी तसेच उच्‍च शिक्षण संस्‍थामधील सुमारे 605 अभ्‍यासक्रमांच्‍या शैक्षणिक शुल्‍कात 50 टक्के शुल्‍क सवलतही अल्‍पसंख्‍याक विद्यार्थ्‍यांना महाराष्‍ट्र शासनातर्फेदेण्‍यात येत आहे , अशी माहिती मुख्यमंत्री श्री.देवेद्र फडणवीस यांनी यावेळी दिली.

आला हजरत इमाम अहमद रजाखान बरेलवी यांच्‍या 100 व्‍या उर्सच्‍या निमित्‍ताने आयोजित या परिसंवादाप्रसंगी मुख्‍यमंत्री यांनी आला हजरत यांच्‍या व्‍यक्तिमत्‍वावर प्रकाश टाकला. आला हजरत व इतर सुफी संतानी आपल्‍या शिकवणीतून प्रेम व शांतीचा संदेश जगभर पसरवून धर्म, संस्‍कृती व विचार यांना एकत्र आणले व ही परंपरा पुढे अखंडित ठेवून असंख्‍य लोकांना जीवन जगण्‍याची प्रेरणा व बळ दिले, अशी भावना फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली.

या कार्यक्रमास मुन्‍नाझम फलाईहिया या संस्‍थेचे पदाधिकारी, इस्‍लामिक राष्‍ट्र व देशभरातून आलेले विचारवंत व विद्यार्थी उपस्थित होते.