मनपा-ग्रीन व्हिजीलचे आवाहन : पोर्णिमा दिवसानिमित्त जनजागृती
नागपूर, : महिन्यातून किमान एक दिवस पोर्णिमेच्या उजेड्या रात्री किमान एक तास अनावश्यक वीज दिवे बंद करा आणि विजेची बचत करून राष्ट्रहितात योगदान द्या, असे आवाहन नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनतर्फे करण्यात आले.
नागपूर महानगरपालिका आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या वतीने प्रत्येक पोर्णिमेला ‘पोर्णिमा दिवस’ साजरा करण्यात येतो. उजेड्या रात्री वीज दिवे किमान एक तास बंद करावे आणि त्यातून वीज बचत करावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. तत्कालीन महापौर प्रा. अनिल सोले यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाला सुरुवात झाली. महापौर संदीप जोशी आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात मनपाच्या विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए.एस. मानकर आणि ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात प्रत्येक पोर्णिमेला शहरातील विविध भागात हा उपक्रम राबविण्यात येतो. सोमवारी (ता, १०) प्रताप नगर चौकात पोर्णिमा दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोनच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसह ग्रीन व्हिजील फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी परिसरातील प्रतिष्ठानांमध्ये जाऊन व्यावसायिकांना पोर्णिमा दिवसामागची संकल्पना सांगितली. किमान एक तास पोर्णिमा दिवसाच्या निमित्ताने अनावश्यक वीज दिवे बंद करण्यात यावी आणि विजेची बचत करावी, असे आवाहन केले.
स्वयंसेवकांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यावसायिकांनी या उपक्रमात सहभाग नोंदविला. इतकेच नव्हे तर यापुढेही प्रत्येक पोर्णिमा दिवसासोबतच अन्य दिवशीही अनावश्यक वीज दिवे बंद ठेवण्याचे आश्वासन दिले. नागपूर महानगरपालिकेच्या वतीनेही अनावश्यक पथदिवे एक तासाकरिता बंद करण्यात आले होते.
या उपक्रमाच्या वेळी नागपूर महानगरपालिकेच्या लक्ष्मीनगर झोनच्या वतीने सहायक अभियंता कल्पना मेश्राम, उपअभियंता राजेंद्र राठोड, गजेंद्र तारापुरे, सुनील नवघरे, प्रदीप खोब्रागडे, प्रकाश रुद्रकार यांची उपस्थिती होती. ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कौस्तभ चॅटर्जी यांच्या नेतृत्वात सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, बिष्णूदेव यादव, शीतल चौधरी, नम्रता जव्हेरी, प्रिया यादव, अश्विनी डबाले, चिन्मय धिमन, सचिन मनवानी यांनी जनजागृती अभियानात सहभाग घेतला. विशेष म्हणजे कोलकाता विद्यापीठाचे प्राध्यापक अर्नब चॅटर्जी, स्मिता साहू, शुभोश्री मोजुमदार हे सुद्धा या अभिनव उपक्रमात सहभागी झाले आहेत.