Published On : Sat, Jul 20th, 2019

राजकीय पक्षांनी नवमतदारांच्या नावनोंदणीसाठी पुढाकार घ्यावा-जिल्हाधिकारी अश्विन मुदगल

Advertisement

नागपूर : येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने 18 वर्षावरील प्रत्येक युवक-युवतीला मतदार नावनोंदणीत सहभागी करुन घेण्यासाठी नोंदणीकृत सर्व राजकीय पक्षांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी आज केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या छत्रपती सभागृहात आयोजित विविध नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या पदाधिका-यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा तसेच रमेश दलाल, अनिल राय, प्यारुद्दीन काजी, नंदकिशोर माहेश्वरी, यशवंत रहांगडाले, आसिफ खान, अमोल केने, राहूल सिरिया, प्रशांत पाटील, नगर सेवक बंटी शेळके, तीर्थानंद पटोले आदी विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

पर्यवेक्षक, सहायक मतदार नोंदणी अधिकारी हे 5 ऑगस्‍टपर्यंत तपासणी करतील. त्यानंतर 13 ऑगस्ट रोजी दावे व हरकती निकाली काढतील. तर 16 ऑगस्टपर्यंत उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी मतदार यादी निरीक्षक यांच्याद्वारे मतदार यादीची विशेष तपासणी होईल. डाटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. ही सर्व प्रक्रिया संपल्यानंतर 19 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आज शनिवार, 20 जुलै व उद्या रविवार 21 जुलै रोजी मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला असून या विशेष मोहिमेअंतर्गत सर्व मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) हे उपस्थित राहतील. तसेच पुन्हा 27 व 28 जुलै, 2019 रोजी विशेष मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. या मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूका विचारात घेऊन मतदार म्हणून नोंदणी झालेली नाही अशा वंचित नागरिकांना मतदार नोंदणीसाठी आणखी संधी मिळावी व त्यांचा मतदारयादीत समावेश करण्यासाठी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्याचे घोषीत केले आहे. या कार्यक्रमाअंतर्गत 30 जुलै 2019 पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. 1 जानेवारी रोजी वयाची अठरा वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांनी तसेच ज्यांचे नाव मतदार यादीत नोंदविले नाही अशा मतदारांनी नमुना क्रमांक सहा भरुन आपले नाव मतदार यादीत नोंदणी करुन घेण्यासाठी नोंदणीकृत राजकीय पक्षांनीही पुढाकार घेत युवक-युवतींची नावनोंदणी करुन घेण्यासाठी आपापल्या भागात प्रयत्न करावेत, असेही यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

ज्या मतदारांचे स्थलांतरण झाले आहे किंवा मतदार यादीत दुबार नाव आहे अशांनी मतदार नमुना क्रमांक सात भरुन आपल्या वगळणीबाबत अर्ज सादर करावा. मृत मतदारांच्या कुटुंबियांनी मृत मतदाराच्या नावाची वगळणी करण्याबाबत आवश्वक कागदपत्रासह नमुना सातमध्ये अर्ज करु शकतात. ज्या मतदारांच्या नावात, फोटोमध्ये, पत्त्यामध्ये चुका आहेत ते नमुना क्रमांक आठ भरुन आपल्या चुकांची दुरुस्ती करु शकतात. ज्या मतदारांचे नाव एका भागातून दुसऱ्या भागामध्ये स्थलांतरीत करावयाचे आहे त्यांनी अर्ज नमुना आठ अ सादर करुन आपले नाव योग्य भागात स्थलांतरीत करुन घ्यावे. या कार्यक्रमामध्ये मतदार यादीत प्राप्त झालेले सर्व दावे व हरकती निकाली काढून दिनांक 19 ऑगस्ट, 2019 रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिध्दी करण्यात येईल.