
पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी दारूमुळे झालेल्या मृत्यूंच्या मालिकेने राज्य हादरले असून आतापर्यंत १४ जणांचा बळी गेल्याने खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने पोलिस प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांशी थेट संपर्क साधत या प्रकरणाचा मुळापर्यंत जाऊन तपास करण्याच्या सूचना दिल्या. “कोणतीही हयगय सहन केली जाणार नाही. एकही आरोपी सुटता कामा नये,” अशा स्पष्ट शब्दांत त्यांनी पोलिसांना निर्देश दिल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाचा तपास समन्वयाने सुरू असून पोलिसांसोबत राज्याचा अबकारी विभागही सक्रिय झाला आहे. शहरातील विविध भागांत रात्रभर छापेमारी करण्यात आली. विषारी दारू नेमकी कुठे तयार झाली आणि तिचे जाळे किती मोठे आहे, याचा शोध सध्या घेतला जात आहे.
या प्रकरणात कर्नल विरखा सिंग याला मुख्य आरोपी मानण्यात येत असून त्याच्यासह आणखी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. आरोपींवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले असून आणखी काही जणांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, मृत्यूमागील नेमके कारण स्पष्ट करण्यासाठी वैद्यकीय आणि फॉरेन्सिक तपासही सुरू करण्यात आला आहे. राज्यभरात अवैध दारूविक्रीविरोधात मोठी मोहीम उभारली जाण्याची शक्यता प्रशासनातील सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.







