रायगड : रायगडातील महडमध्ये असलेल्या नवीन वसाहतीत एका वास्तूपूजेच्या महाप्रसादातून ८० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये तीन चिमुरड्यांसह चौघांचा मृत्यू झाला आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार खालापूर तालुक्यातील महडमध्ये असलेल्या नवीव वसाहतीत माळी कुटुंबाच्या घरी सोमवारी वास्तूशांतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूजेनंतर सर्वांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा घेऊन घरी परतलेल्या नातेवाईकांना रात्री उशिरा उलटी आणि मळमळण्याचा त्रास सुरु झाला.
त्यानंतर जवळपास ८० जणांना विषबाधा झाल्याची माहिती असून सुरुवातीला सर्वांना खोपोलीतील रुग्णालयात नेण्यात आलं. त्यापैकी २५ जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर नवी मुंबई आणि पनवेलमधील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेत दुर्दैवाने तीन लहान मुलांसह चौघा जणांचा मृत्यू झाला.
या घटेनमुळे संपूर्ण महड परिसरात शोककळा पसरली आहे.