
नवी दिल्ली : देशभरात उन्हाचा तडाखा वाढत असताना नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सावध राहण्याचा आणि आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर स्वतःसोबतच ज्येष्ठ नागरिक आणि मुक्या प्राण्यांप्रतीही संवेदनशील राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
तीव्र उष्णतेमुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे पुरेसे पाणी पिणे, घराबाहेर जाताना पाण्याची बाटली जवळ ठेवणे आणि दुपारच्या कडक उन्हात बाहेर पडणे टाळणे आवश्यक असल्याचे मोदी यांनी सांगितले.
समाजात परस्पर मदतीची भावना जपण्याचे आवाहन करत त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्यांचे कौतुक केले. तहानलेल्या लोकांना पाणी देणे ही मोठी मानवसेवा असल्याचेही त्यांनी नमूद केले.
याशिवाय घरातील वृद्ध व्यक्तींना वेळोवेळी पाणी पिण्याची आठवण करून द्यावी आणि त्यांची विशेष काळजी घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. उष्णतेचा फटका पक्षी आणि प्राण्यांनाही बसत असल्याने घराबाहेर किंवा गच्चीत पाण्याची भांडी ठेवण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले.








