नागपूर: मध्यप्रदेशातील चौराई प्रकल्पामुळे पेंच प्रकल्पात पाण्याच्या जलसाठ्यावर होणाऱ्या परिणामामुळे शहरातील पाणी पुरवठा तसेच सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन देतांना पिण्याच्या पाण्याचे आवश्यकतेनुसार प्राधान्याने नियोजन करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.
रविभवन येथे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली होती, त्याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी आमदार सर्वश्री सुधाकर देशमुख, सुनील केदार, समीर मेघे, मल्लिकार्जुन रेड्डी, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, तसेच सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. इंगळे, उपविभागीय महसूल अधिकारी राम जोशी, अविनाश कातडे, डब्ल्यूसीएल, माईलचे व्यवस्थापकीय संचालक, पाणी वाटप संस्थेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
पेंच प्रकल्पामध्ये चौराई धरणामुळे पाण्याच्या येणाऱ्या प्रवाहामध्ये घट झाल्यामुळे तसेच पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे पाण्याची पातळी सरासरीपेक्षा कमी असल्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करताना नागपूर शहराला पिण्याच्या पाण्याच्या आरक्षणासह इतर पाणी पुरवठा योजनांना प्राधान्याने पाणी उपलब्ध झाल्यानंतर सिंचनासाठी आवश्यक पाणी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात पर्यायी उपाययोजना तात्काळ सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिल्यात. खरीप हंगामासाठी कामठी, पारशिवनी, मौदा, सावनेर व रामटेक आदी तालुक्यात सिंचनासाठी कसे पाणी उपलब्ध करुन देता येईल यासाठी अधिकाऱ्यांनी प्रस्ताव तयार करावे. त्यासोबत वेस्टर्न कोल फिल्डच्या खदाणीतील पाणी सिंचनासाठी कसे वापराता येईल, यासंदर्भात प्रस्ताव तयार करावा. त्यानुसार शासनाची मान्यता घेवून अंमलबजावणी संदर्भात नियोजन करणे सूलभ होईल.
पावसाच्या प्रदीर्घ खंडामुळे जलसाठ्यात आवश्यतेनुसार पाण्याचा संचय झाला नाही. त्यामुळे पावसासंदर्भात हवामान खात्यातर्फे संभाव्य परिस्थितीची माहिती घेवून पुढील नियोजन करण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश देताना पालकमंत्री म्हणाले की, यासंदर्भात तात्काळ लागू करावयाच्या उपाययोजना तसेच कायमस्वरुपी पाण्याची उपलब्धता कशी होईल यासंदर्भात करावयाच्या प्रकल्पनिहाय उपाययोजना संदर्भात प्रस्ताव तयार करावा. कोळसा खदाणीमधून दैनंदिन उपसा होत असलेले पाण्याचा वापर कसा करता येईल, यादृष्टीने भानेगाव इंदर, कामठी, गोंडेगाव या खाणीमधील पाणी कालव्यापर्यंत कसे आणता येईल, तसेच या संदर्भातील नियोजनाचा अभ्यास करुन प्रकल्प अहवाल तात्काळ तयार करावा, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
भविष्यातील पाण्याच्या आवश्यकतेनुसार उपाययोजना करताना कन्हाण नदी, वळण बंधारा, कन्हाण नदीतील पाणी पेंच उजव्या कालव्यापर्यंत आणणे तसेच सिहोरा येथे कन्हाण नदीवर बंधारा, बाबदेव बंधाऱ्यावर उपसासिंचन योजना आदी योजना कार्यान्वित झाल्यास सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात मदत होईल, असेही यावेळी सिंचन विभागाचे अधीक्षक अभियंता श्री. इंगळे यांनी बैठकीत सांगितले.
पिण्याचे पाणी व सिंचना संदर्भात आमदार सुधाकर देशमुख, सुनिल केदार, समीर मेघे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निशाताई सावरकर यांनी बैठकीत उपयुक्त सूचना केल्या.