मुंबई : सध्या देशात कुपोषण, महागाई आणि वाढत्या करभारामुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे अधिक कठीण झाले असताना, लोकप्रतिनिधींच्या एका शाही जेवणावर सरकारी तिजोरीतून हजारोंचा खर्च केल्याचे उघडकीस आले आहे.
मुंबईत नुकतीच संसद व राज्य विधीमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद पार पडली. या परिषदेच्या समारोपावेळी खासदार आणि आमदारांसाठी शाही भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. विशेष म्हणजे या एका जेवणासाठी सरकारकडून प्रति व्यक्ती सुमारे ४५०० रुपये खर्च करण्यात आले. यामध्ये चांदीच्या ताटासाठी ५५० रुपयांचे भाडे, तर जेवणावर ४००० रुपयांहून अधिक खर्च करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या प्रकारामुळे गंभीर चर्चा सुरू झाली आहे. राज्याच्या तिजोरीवर आधीच मोठा बोजा असताना, आणि दुसरीकडे गरिबांसाठी पुरेशी साधनसंपत्ती नसल्यानं अनेक मुलं कुपोषणाची शिकार होत असताना, लोकप्रतिनिधींच्या जेवणावर इतका खर्च करणं योग्य आहे का? असा सवाल समाजात उपस्थित झाला आहे.
सध्या जनतेकडून यावर संताप व्यक्त केला जात असून, लोकप्रतिनिधींनी साधेपणाचा आणि जबाबदारीचा आदर्श घालून द्यावा, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.