Published On : Mon, Sep 2nd, 2019

कामठी तालुक्यातील ग्रामपंचायती कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर

Advertisement

मिनिमंत्रालयाचा विकास व कामकाज ठप्प , ग्रामस्थांची कोंडी, पदाधिकारी हतबल, ग्रामसेवकासह परीचालकांचे कामबन्द आंदोलन

कामठी:-स्थानिक स्वराज्य संस्थे अंतर्गत ग्रामीण भागात केंद्र व राज्य शासनाच्या योजनांच्या अंमल बाजावणीसह विकास कामांना गती देण्यासाठी ग्रामपंचायत ही महत्वपुर्ण संस्था आहे .या संस्थेअंतर्गत ग्रामसेवक तसेच आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत कार्यरत संगणक परिचालक यांची भूमिका महत्त्वाची असते परंतु मागील काही दिवसापासून ग्रामसेवकांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. यामुळे संगणक परिचालकावर कार्यभाराची जवाबदारी आली होती त्यामुळे संगणक परीचालकांनी सुद्धा आंदोलन पुकारले .ग्रामसेवकांनी ग्रामपंचायत कपाटाच्या किल्ल्या तसेच शील व शिक्के गटविकास अधिकारी कडे जमा केल्या मात्र ग्रामसेवक व संगणक परिचालक या दोन महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारल्याने कामठी तालुक्यातील ग्रामपंचायती ह्या नॉट रीचेबल सह कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर गेल्या आहेत.

आपल्या राज्यस्तरीय मागण्यासाठी महाराष्ट्र ग्रामसेवक युनियन ने 9 ऑगस्ट रोजी क्रांती दिनापासून असहकार आंदोलन सूरु केले होते .प्रलंबित मागण्या पूर्ण होत नसल्याने 22 ऑगस्ट पासून मागण्या जो पर्यंत पूर्ण होत नाही तो पर्यंत काम बंद करण्याचा इशारा दिला होता शासन दखल घेत नसल्याने तालुक्यातील सर्वच ग्रामसेवकांनी कपाटाच्या किल्ल्यासह ग्रामपंचायतिचे आवश्यक शील शिक्के बीडीओ सचिन सूर्यवंशी यांच्याकडे जमाकरीत मागण्या पूर्ण होई पर्यंत बेमुद्दत कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेत आंदोलन करीत असल्याने ग्रामपंचायत चे कामे ठप्प पडले आहेत.

ऑगस्ट महिन्यातील ग्रामसभेला ग्रामपातळीवर विशेष महत्व आहे 15 ऑगस्ट ला काही ग्रामपंचायतीत विशेष ग्रामसभा घेण्यात आल्या तर कोरम अभावी काही ग्रामपंचायतीत 26 ऑगस्ट ला ग्रामसभा घेण्यात आल्या.या ग्रामसभेत ग्रामपंचयात सचिव उपस्थित नसल्याने ग्रामसभा ही नामधारी ठरली.ग्रामसेवकांच्या या कामबंद आंदोलना मुळे गावपातळीवरील कामकाज प्रभावित झाले असून ग्रामविकासाला खीळ बसली आहे.एकीकडे आचार संहिता लागण्याच्या तोंडावर असून ग्रामसेवक सुद्धा आंदोलनात व्यस्त आहेत परिणामी ग्रामविकास थांबला असून कित्येक ग्रामपंचयात कार्यालयिन कामासह ग्रामविकास मंजूर कामे प्रलंबित आहेत त्यामुळे शासनाने वरिष्ठ पातळीवर ग्रामसेवकांच्या मागण्याविषयी ठोस निर्णय घेऊन ग्रामविकासाला बसलेली खीळ थांबवावी अशी मागणी ग्रामवासीयांच्य वतीने सरपंच संघटनेच्या नागपूर जिल्हाध्यक्ष व कामठी तालुक्यातील कढोली ग्रामपंचायत च्या सरपंच प्रांजल राजेश वाघ यांनी केले आहे.

सरपंच बंडू कापसे:-प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी
ग्रामीण भागाच्या विकासाचा केंद्रबिंदू मिनिमंत्रालयाचे ग्रामसेवक व संगणक परिचालक बेमुद्दत कामबंद आंदोलनात व्यस्त आहेत .परिणामी ग्रामीन भागाचा विकास ठप्प झाला आहे .ग्रामस्थ विविध कामासाठी पायपीट करूनही त्यांचे कामे होत नाही तेव्हा वरिष्ठ अधिकारी व शासनाने याबाबत गंभीर्याची भूमिका घेत आंदोलनकारी ग्रामसेवक व संगणक परीचालकाचा प्रश्न त्वरित सोडवावा व तात्काळ ग्रामपंचायतीचे कामकाज सुरळीत पूर्ववत सुरु करण्याबाबत तोडगा काढावा तोवर ग्रामपंचायतीला हंगामी सचिव देण्यात यावा अन्यथा सरपंच संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरपंच संघटनेचे कामठी तालुकाध्यक्ष व खैरी ग्रामपंचायत चे सरपंच मोरेश्वर उर्फ बंडू कापसे यांनी दिलेल्य प्रसिद्धीपत्रकातून दीला आहे.

संदीप कांबळे कामठी