मुंबई : बिहारच्या पाटणा शहरात आज विरोधकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, खासदार प्रफुल्ल पटेल उपस्थित आहेत. दरम्यान, या बैठकीवर भाजपचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडले.
पाटण्यात जी बैठक सुरू आहे त्या बैठकीला त्यांनी ‘मोदी हटाव’ असं नाव दिलं असलं तरी ती ‘मोदी हटाव’ नव्हे तर ‘परिवार बचाव’ बैठक आहे. देशातल्या सगळ्या परिवारवादी पार्ट्या एकत्र आल्या आहेत. आपला परिवार कसा वाचू शकेल आणि आपल्याच कुटुंबाकडे सत्ता कशी राहील यासाठी ते प्रयत्न करत आहेत, म्हणूनच ते लोक एकत्र आले आहेत. यांच्यासाठी राज्य चालवणं हा एक धंदा आहे . मात्र भाजप आणि नरेंद्र मोदींसाठी ती एक सेवा असल्याचे फडणवीस म्हणाले.
विरोधकांनी २०१९ ला मोदीविरोधात मोट बांधली होती. मात्र परंतु जनता ही मोदीजींच्याच पाठीशी आहे. २०२४ मध्ये मागच्या वेळेपेक्षा जास्त ताकदीने जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या पाठीशी उभी राहील. विरोधकांनी असे कितीही मेळावे घेतले तरी त्याचा कोणताच फायदा होणार नसल्याचा दावा फडणवीस यांनी केला.