Published On : Mon, Mar 18th, 2024

ईव्हीएमवरून सरकारचा विरोध करणे हा विरोधकांचा बालिशपणा; सुधीर मुनगंटीवारांचा टोला

Advertisement

नागपूर: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ईव्हीएमविरोधात मोदी सरकारला घेरले आहे.यासंदर्भात राज्याचे मंत्री व भाजपचे चंद्रपूर लोकसभेचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांनी भाष्य केले.ईव्हीएमवरून सरकारचा विरोध करणे हा कॉग्रेसचा बालिशपणा असल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कामधून राहुल गांधी यांनी मुंबईतील जनतेशी संवाद साधला.यावेळी ईव्हीएमवरून त्यांनी सरकारवर निशाणा साधला.

राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, हे खरे आहे. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, हिंदुस्तानच्या प्रत्येक संस्थेत आहे, ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स विभागात आहे. इव्हीएमशिवाय मोदी निवडणूक जिंकू शकत नाही. अशा शब्दात राहुल गांधी यांनी हल्लाबोल केला.

यावर मुनगंटीवार म्हणाले की, ईव्हीएमवर राहुल गांधी यांनी संशय व्यक्त केला असलेतर अशा पक्षाला हजारो वर्षे मतदानाच करू नये, ईव्हीएम कोणी आणला, ईव्हीएम भाजपने आणला नाही तर तो काँग्रेसने आणला आणि आज ईव्हीएमवर खापर फोडतात. पण ते असे करताना कर्नाटक, हिमाचल प्रदेश राज्यात विधानसभा निवडणुक जिंकल्यावर मात्र मोदींचा पराभव असल्याचे सांगतात आणि स्वत: पराभूत झाले की ईव्हीएमला दोष देतात. हा निव्वळ बालिशपणा आहे, असेही मुनगंटीवार म्हणाले.