Published On : Wed, Jun 10th, 2020

वीज कंपन्यांमधील अधिकारी- कर्मचाऱ्यांचे होणार मुल्यांकन-डॉ. नितीन राऊत, मंत्री, ऊर्जा

Advertisement

मुंबई : महावितरण कंपनी मध्ये तांत्रिक व अतांत्रिक अधिकारी-कर्मचाऱ्यांच्याबाबत डॉ.नितीन राऊत यांनी आज संबंधीत अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत आढावा घेतला.

सदर कंपनीमध्ये आकृतीबंधानुसार असलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कर्तव्ये आणि जबाबदाऱ्यांचे पुर्नमुल्यांकन करुन ही पदे खरोखरच आवश्यक आहेत काय ? या बाबत आढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.

ऊर्जा विभागामध्ये तांत्रिक अधिकाऱ्यांचा भरणा मोठया प्रमाणात असून कंपनी नियमानुसार महावितरणची क्षमतावृध्दी अपेक्षित आहे तथापि या विभागाशी संबंधीत उद्भवणाऱ्या उणीवांबाबत असंख्य तक्रारी येत असतात याचाच अर्थ महावितरणच्या प्रणालीमध्ये दरी असल्याचे आढळून येते. तसेच रिक्त जागा पदोन्नतीने भरणे आवश्यक असून सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मागील दाराने नियुक्त्या देणे गैर आहे, त्यामुळे तरुणांच्या रोजगाराची संधी हिरावल्या जाते.

महावितरणच्या माहिती व तंत्रज्ञान शाखेत सुमारे 550 पदे असतांना सुध्दा या क्षेत्रात हवी ती उंची गाठता आलेली नाही . राज्यातील सर्वसामान्य वीज ग्राहक आणि महावितरण कंपनी यामध्ये सुसुत्रता निर्माण होऊ शकली नाही त्यामुळे या शाखेला सुधारणे, अद्ययावत करणे महत्वाचे आहे.

महावितरणच्या वित्त विभागात देखील मोठया प्रमाणात पदे अस्तित्वात असून या क्षेत्रातही महावितरणचे काम समाधानकारक नाही. या व्यतिरिक्त महावितरणच्या जनसंपर्क विभागाने माहिती बरोबरच तक्रार निवारणाच्या कामात सहाय्य करणे आवश्यक आहे, या दृष्टीने सर्व अधिकारी-कर्मचारी यांच्या कामांचे, त्यांच्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्यांचे पुनर्मुल्यांकन करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश संचालक(मानव संसाधन) महावितरण यांना देण्यात आले.