वडगाव शेरी: देशाच्या विकासात मुस्लिम धर्मीयांचे योगदान मोठे आहे. असे असताना महाराष्ट्रातील दोन कोटी मुस्लिमांपैकी एकालाही भाजपने मंत्री का केले नाही, असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. तसेच भाजप केवळ द्वेशाचे राजकारण करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्यातील भाजप सरकार जरी शिवाजी महाराजांचे नाव घेऊन सत्तेत आले असले, तरी सर्वधर्मीयांना समान वागणूक देण्याचा शिवाजी महाराजांचा आदर्श त्यांनी घेतलेला नाही.
हल्लाबोल सभेच्या तयारीसाठी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्त्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
पवार म्हणाले, ‘‘पुणे शहारातील पाणी, कचरा, वाहतूक कोंडी आदी प्रश्न प्रलंबित आहेत. केवळ आश्वासन देऊन भाजपचे राज्यकर्ते झोपले आहेत. नितीन गडकरी हे हजारो कोटींची घोषणा करतात. मग वाहतूक कोंडी का सुटत नाही. भाजपने एकही कारखाना आणला नाही.’’
पुण्यातील अनेक प्रश्न रखडले आहेत. पुण्याकडे गिरीश बापट यांच्या रूपाने कॅबिनेट मंत्रिपद आहे, तर दिलीप कांबळे राज्यमंत्री आहेत. हे एक फुल आणि एक हाफ मंत्री मग नेमके काय काम करतात, असा खोचक टोला अजित पवार यांनी या वेळी लगावला.
या वेळी खासदार वंदना चव्हाण, राष्ट्रवादीचे वडगाव शेरी विधानसभा अध्यक्ष नारायण गलांडे, पालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे, माजी आमदार बापूसाहेब पठारे, सुनील टिंगरे, वडगाव शेरीतील आजी माजी नगरसेवक, रमेश आढाव, राजेंद्र खांदवे, भीमराव गलांडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.