मुंबई : भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची यादी नुकतीच जाहीर केली आहे.या यादीद्वारे १९५ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीतून तिसऱ्यांदा, गृहमंत्री अमित शाह गांधीनगरमधून दुसऱ्यांदा आणि संरक्षणंमंत्री राजनाथ सिंह लखनौमधून तिसऱ्यांदा लोकसभा लढवणार आहेत. या पहिल्या यादीवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्षेप घेत भाजपवर हल्लाबोल केला आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची रविवारी (३ मार्च) रात्री मुंबईतल्या धारावी येथे सभा पार पडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर निशाणा साधला.
भाजपाने १९५ लोकांची यादी जाहीर केली आहे. या यादीत कुणाची नावं आहेत? मोदी-शाह यांची नावं आहेत. पण, आम्हाला नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी नावं माहिती नव्हती. भाजपाची ओळख आम्हाला प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे यांनी करुन दिली. त्यानंतर त्यांच्याबरोबर नितीन गडकरी आले. युतीच्या काळात त्यांनी ५५ उड्डाणपूल बांधले, भाजपाचा निष्ठावान कार्यकर्ता असलेला माणूस.. त्यांचं नाव पहिल्या यादीत नाही. परंतु, मुंबईतला एक माणूस ज्याच्यावर भाजपाने भ्रष्टाचाराचे, बेहिशेबी मालमत्ता साठवून ठेवल्याचे आरोप केले होते. त्या कृपाशंकर सिंहचं नाव पहिल्या यादीत आहे. परंतु, नितीन गडकरींसारख्या निष्ठावान भाजपा कार्यकर्त्याचं नाव या यादीत नाही. ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? याला भाजपाची जाहिरातच म्हणावी लागेल, असा शब्दात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले.
दरम्यान येत्या निवडणुकीत आपल्यालाभाजपाला तडीपार करायचे आहे आणि दिल्लीच्या तख्तावर आपला भगवा फडकवायचा आहे, असेही ठाकरे म्हणाले.