नागपूर: राज्य अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी भाजप मंत्री नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रतिमा राणे हेतुपुरस्सर खराब करत आहेत. राणे वारंवार वादग्रस्त विधान करताना फडणवीसांचे नाव घेतात, ज्यामुळे मुख्यमंत्र्यांची प्रतिमा मलीन होत असल्याचा आरोप खान यांनी केला.
प्यारे खान म्हणाले की, आयोगाला नितेश राणे यांच्याविरोधात एक-दोन नव्हे, तर ४० हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे संपूर्ण राज्याचे नेते आहेत, केवळ हिंदू समाजाचे नाहीत. त्यांनी सर्व समाजासाठी काम केले आहे. म्हणूनच राणेंनी बोलण्यापूर्वी स्वतःची प्रतिमा तपासावी.
वर्च्युअल ईदच्या विधानावरून वाद-
प्यारे खान यांनी नितेश राणेंच्या ‘वर्च्युअल ईद’बाबतच्या वक्तव्यालाही जोरदार प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, ज्या दिवशी वर्च्युअल ईदसाठी कायदा केला जाईल, त्या दिवशी आम्ही तो कायदा पाळू. सध्या आम्ही विद्यमान कायद्यांनुसारच ईद साजरी करतो. गोहत्या प्रतिबंधित आहे, त्याचे आम्ही समर्थन करतो. पण बकऱ्याच्या व्यवसायावर अनेकांचे जीवन अवलंबून आहे. त्यामुळे कुर्बानीवर बंदी घालणे म्हणजे दोन्ही समाजांवर अन्याय होईल.
राणेंवर कारवाईची शक्यता-
प्यारे खान यांनी स्पष्ट इशारा दिला की, जर नितेश राणे यांचे वर्तन असेच चालू राहिले, तर त्यांच्या विरोधात कारवाई होणे निश्चित आहे. त्यांनी सांगितले, “फडणवीस हे जागतिक पातळीवर ओळखले जाणारे नेते आहेत. नितेश राणेंनी आपली वैयक्तिक मते मांडावीत, त्यात फडणवीस यांना न घालता.”
भाजप सरकारबद्दल कौतुक-
यावेळी प्यारे खान यांनी भाजप सरकारचे कौतुकही केले. “ही सरकार पारदर्शक आहे. चुकीचे वागणाऱ्यांवर कारवाई होते. त्यामुळे आता नितेश राणे यांच्यावर कारवाई होण्याची वेळ आली आहे,” असे ते म्हणाले. यासोबतच त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे राणेंविरोधात तक्रार दाखल केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
नेमकं काय म्हणाले होते नितेश राणे?
सोमवारी नितेश राणे यांनी बकरीद ‘वर्च्युअल’ पद्धतीने साजरी करण्याची सूचना मुस्लिम समाजाला दिली होती. तसेच धार्मिक नेत्यांनी बकरीद पर्यावरणपूरक पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करावे, असेही ते म्हणाले होते. नियम व कायद्यांचे उल्लंघन करत कुर्बानी दिल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी त्यांनी चेतावणीही दिली होती.