नागपूर/३१ डिसेंबर : मानवी चुकांमुळे होणाऱ्या अपघातांवर नियंत्रण आणण्यासाठी दुघर्टनामुक्त भारत या संघटनेने नववर्षाच्या पूर्वसंध्येला वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करणाऱ्या वाहन चालकांचा सत्कार कार्यक्रम आयोजित केला आहे. आज फुटाला तलाव येथे सायंकाळी ६ वाजता होऊ घातलेल्या कार्यक्रमात या वाहनचालकांना पुष्पगुच्छ आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाईल.
शहरात २०२० या नवीन वर्षांत कठोरपणे वाहतूक नियम पाळणाऱ्या किमान १ लाख नागरिकांची नोंद करण्याचा प्रयत्न आहे. ‘रस्ता सुरक्षा’ हा नियम तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरी वस्ती, शाळा-कॉलेजेस, खासगी आणि सामाजिक संस्था यांच्या सहकार्याने मशाल रॅली सुरू केली जाईल. यासह अपघाताला कारणीभूत चुकांवर नियंत्रण आणण्यासाठी ‘उठ तरुणा जागा हो, अपघातमुक्तीचा धागा हो’ ही लोकचळवळ उभारली जाईल, अशी माहिती पत्रपरिषदेत देण्यात आली.