Published On : Tue, Dec 26th, 2017

स्वच्छ सर्वेक्षणासाठी लोकप्रतिनिधींचा सहभाग आवश्यक : चंद्रशेखर बावनकुळे

Advertisement


नागपूर: स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वच्छ सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शहराला अग्रक्रमांकात आणण्याकरिता स्थानिक लोकप्रतिनीधींचा सहभाग आवश्यक आहे. त्याशिवाय आपले शहर अग्रक्रमांकात येणार नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. मंगळवारी (ता.२६) रोजी महाल येथील राजे रघुजी भोसले नेताजी नगर भवन येथे आयोजित स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत होणाऱ्या स्वच्छ सर्वेक्षणाचा आढावाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती संदीप जाधव, सत्तापक्ष नेते संदीप जोशी, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आयुक्त अश्विन मुदगल प्रामुख्याने उपस्थित होते.

पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, आपण जी संस्था मोठी करण्याकरिता, नावारूपास आणण्याकरिता निवडून आलो, त्या संस्थेला मोठे करण्याकरिता आपली मदत मोलाची आहे. प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागातील १०० नागरिकांकडून स्वत: स्वच्छता ॲप डाऊनलोड करून घ्यावी, ज्या नागरिकांच्या स्मार्टफोनमध्ये ही ॲप डाऊनलोड केली आहे, त्या नागरिकांची यादी मला सादर करावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी नगरसेवकांना दिले. शेवटचे सात दिवस नगरसेवकांनी झोकून कार्य करावे. आपले सहकार्य शहराला नावरूपास आणण्यासाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.


स्वच्छ भारत अभियानाच्या स्वच्छ सर्वेक्षणाच्या सद्यस्थितीबद्दल आयुक्त अश्विन मुदगल यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. कार्यक्रमाचे संचालन अतिरिक्त उपायुक्त राजेश मोहिते यांनी केले. आभार महापौर नंदा जिचकार यांनी मानले. कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, मनपातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.