
नवी दिल्ली : ‘नीट’ पेपरफुटीविरोधात देशभरातील विद्यार्थी न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत. पेपरफुटी, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहे. मात्र, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर समोर आलेली एक धक्कादायक आकडेवारी शिक्षण व्यवस्थेतील आणखी गंभीर वास्तव समोर आणते. देशात दररोज सरासरी ४० विद्यार्थी आत्महत्या करत आहेत. म्हणजे प्रत्येक दिवशी ४० कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरो (NCRB) च्या ‘Accidental Deaths and Suicides in India-2024’ अहवालानुसार, २०२४ मध्ये देशभरात १४ हजार ४८८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. २०२३ च्या तुलनेत ही संख्या ४.३ टक्क्यांनी वाढली आहे. विशेष म्हणजे, देशातील एकूण आत्महत्यांचे प्रमाण किंचित कमी झाले असताना विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये मात्र वाढ झाली आहे. एकूण आत्महत्यांपैकी ८.५ टक्के मृत्यू विद्यार्थ्यांचे आहेत.
पेपरफुटी नाही, संपूर्ण व्यवस्था प्रश्नचिन्हाखाली-
नीट पेपरफुटीनंतर अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष अनिश्चिततेत गेले. काहींनी पुन्हा तयारी सुरू केली, तर काहींवर मानसिक तणावाचे मोठे ओझे आले. मात्र, शिक्षणतज्ज्ञांच्या मते, विद्यार्थी आत्महत्यांचे मूळ केवळ पेपरफुटीत नाही. गुणांची स्पर्धा, पालकांच्या अपेक्षा, कोचिंग संस्कृती, करिअरची असुरक्षितता, बेरोजगारीची भीती आणि मानसिक आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष या सर्वांचा विद्यार्थ्यांवर एकत्रित परिणाम होत आहे. पेपरफुटीसारख्या घटना या तणावात आणखी भर घालतात.
महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी आत्महत्या-
विद्यार्थी आत्महत्यांच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अव्वल ठरला आहे. २०२४ मध्ये राज्यात १,९०९ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या असून, देशातील एकूण विद्यार्थी आत्महत्यांपैकी १३.२ टक्के प्रकरणे महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर उत्तर प्रदेश (१,५८५), मध्य प्रदेश (१,४४७) आणि तमिळनाडू (१,२८७) यांचा क्रमांक लागतो.
दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक प्रमाण-
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्यांचे प्रमाण २५.६ टक्के इतके सर्वाधिक आहे. त्यानंतर बारावीपर्यंतचे १८.३ टक्के आणि आठवीपर्यंतचे १७.७ टक्के विद्यार्थी आहेत. यावरून शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांवरील मानसिक दडपण वाढत असल्याचे स्पष्ट होते.
गुणांपेक्षा मन वाचवा-
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, शाळा, महाविद्यालये आणि स्पर्धा परीक्षा केंद्रांमध्ये प्रभावी समुपदेशन व्यवस्था उभी करणे ही आता गरज नसून अपरिहार्यता आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याला अभ्यासाइतकेच महत्त्व देणे, नियमित संवाद वाढवणे आणि अपयशाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.
‘नीट’ आंदोलनाने परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींवर प्रकाश टाकला असला, तरी विद्यार्थ्यांच्या वाढत्या आत्महत्यांची आकडेवारी अधिक मोठा आणि अस्वस्थ करणारा प्रश्न उपस्थित करते. परीक्षा निष्पक्ष असणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच विद्यार्थ्यांचे आयुष्य सुरक्षित ठेवणारी शिक्षण व्यवस्था उभी करणेही आवश्यक आहे. कारण प्रश्न केवळ करिअरचा नाही, तर हजारो विद्यार्थ्यांच्या जगण्याचा आहे.
पेपर लीक पर सख्त कानून, ठाकरे बंधुओं पर तंज #Bawankule #NagpurNews #PoliticalNews...
नागपुर के एमआईडीसी थाना क्षेत्र में मोबाइल दुकान में चोरी #nagpurnews #crimenews...
हुड़केश्वर पुलिस की कस्टडी से कुख्यात चोर फरार #nagpurnews #crimenews #accused #newsupdate
नागपुर में दिव्यांगजनों को मिला नया सहारा #HyundaiMobisIndia #DisabilitySupport #NGO #NagpurNews
उद्धव ठाकरे के जन्मदिन पर नागपुर में भव्य महाआरती #UddhavThackeray #nagpurnews #news...
सात किलो गांजा, तीन आरोपी गिरफ्तार




