कराड (जि. सातारा) : महाराष्ट्रातील कोणताच प्रकल्प इतर राज्यांमध्ये जायला नको. केंद्र आणि राज्यामध्ये एकाच विचाराचे सरकार असल्याने जास्तीत जास्त प्रकल्प महाराष्ट्रात आणण्याची अपेक्षा माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केली. राज्याचा समतोल विकास साधायचा असेल तर विदर्भ, मराठवाडा, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र व कोकण या विभागांमध्ये उद्योग उभारणीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. ते यशवंतराव चव्हाण यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी प्रीतिसंगम येथे आले होते तेव्हा बोलत होते.
काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेला सर्वस्तरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, महाराष्ट्रामध्ये या यात्रेला सर्वोत्कृष्ट प्रतिसाद लाभला. या माध्यमातून पक्षाची यंत्रणा तळागाळापर्यंत मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. काँग्रेसचा समता व एकतेचा विचार समाजाच्या सर्व घटकांना घेऊन चालणारा आहे. देशातील जनता द्वेष, भेदभाव व हुकूमशाही वृत्तीला कंटाळली असून, त्यांना परिवर्तन हवे आहे. म्हणूनच भारत जोडो यात्रेमध्ये विविध क्षेत्रांतील व्यक्ती सहभाग नोंदवून समर्थन देत आहेत.
दरम्यान, खासदार राहुल गांधी यांनी गुजरातला देखील सभा घेतली. सभेला स्थानिक नागरिकांनी प्रचंड उपस्थिती दर्शविली. गुजरातमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. मागील निवडणुकीत थोडी उणीव राहिली होती. मात्र, आता काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागा जिंकणार असल्याचा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला. यावेळी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. अभ्यासू चव्हाण यांच्या वक्त्यव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय समीकरणे नगरपालिका व इतर निवडणुकांमध्ये बदलणार, असेही बोलले जात आहे.