Published On : Mon, Jul 31st, 2017

देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल

Advertisement

jayant-patil
मुंबई:
‘सोनू तुला माझ्यावर भरवसा नाय का’ या गाण्याने सर्वांनाच भुरळ पाडली. आता नेतेमंडळीही याच गाण्याचा आधार घेत विरोधी नेत्यांवर टीका करताना दिसत आहे. ‘लाचार सत्तेसाठी झोल झोल, जनतेचा वाजतोय ढोल ढोल, देवेंद्र वाघाला फिरवतोय गोल गोल’ असे सांगत जयंत पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना चिमटा काढला. जयंत पाटील यांचे सोनू व्हर्जन ऐकून सभागृहात हशा पिकला होता.

विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. मुंबईसह राज्यातील कोणत्याही शहराचा विकास होताना दिसत नसून नगरविकास खात्यात प्रचंड गोंधळ असल्याची टीका त्यांनी केली. मुंबई हगणदारीमुक्त झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे केला होता. पण शहरातील अनेक भागात घाणीचे साम्राज्य आहे. मुंबईसारख्या जागतिक शहराची ही परिस्थिती असेल तर राज्याच्या इतर शहरांची परिस्थिती काय असेल याचा अंदाज येतो असे त्यांनी सांगितले.

सरकार जनतेला स्वस्त दरात घरं देण्याचं स्वप्न दाखवत आहे. २२ लाख घरं बांधण्याची घोषणाही सरकारने केली असली तरी अद्याप एक तरी घर तयार आहे का, असा सवाल त्यांनी विचारला. राज्याच्या एसआरए प्रकल्पांमध्ये प्रचंड घोटाळा असून मोजक्या बिल्डरांच्या फायद्यासाठी सरकार काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवस्मारकाच्या भूमीपूजनाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फक्त देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. २५ वर्ष जी शिवसेना सत्तेत होती त्यांचा साधा उल्लेखही पंतप्रधानांनी केला नाही असा टोला त्यांनी लगावला. शिवसेना- भाजपमधील संबंधांवर पाटील यांनी ‘सोनू’ गाण्याचं व्हर्जनच सभागृहात सादर केले.’वाघाचा झालाय बघा बकरा बकरा, देवेंद्र उद्धवशी कधी तरी गोड बोल’असे जयंत पाटील यांनी सांगतात सभागृहात पुन्हा हशा पिकला.