Published On : Wed, Apr 29th, 2015

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आ.सुनील तटकरे तर कोषाध्यक्षपदी आ.हेमंत टकले यांची एकमताने निवड

Advertisement

Sunil tatkare & Hemant Takle
मुंबई। आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसाधारण सभेत पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे यांची तर कोषाध्यक्षपदी आ.हेमंत टकले यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.

सभेच्या सुरुवातीस पक्षाचे दिवंगत नेते आर. आर. पाटील, सा. रे पाटील, कॉम्रेड गोविंद पानसरे, सुंदरराव सोळंके, सदाशिवराव मंडलिक, अरुणाराजे भोसले, विक्रमसिंह घाटगे तसेच नेपाळ व भारत देशात झालेल्या भूकंपात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना आदरांजली वाहण्यात आली. पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी याबाबतच शोकप्रस्ताव मांडला.

त्यानंतर पक्षाचे राज्यनिवडणूक अधिकारी आ.दिलिप वळसे-पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदासाठी इच्छूकांनी आपली नावे सूचविण्याचे करण्याचे आवाहन केले.त्यातून प्रदेशाध्यक्ष पदासाठी आ. छगन भुजबळ यांनी सुनील तटकरे यांचे नाव सुचविले.तर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांच्या नावाला अनुमोदन दिले. प्रदेशाध्यक्ष या पदासाठी सुनील तटकरे या एकाच नावाची उमेदवारी असल्याने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी एकमताने निवडणूक झाल्याचे असे निवडणूक अधिकारी या नात्याने दिलीप वळसे पाटील यांनी जाहीर केले.

पक्षाच्या खजिनदार पदासाठी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी आमदार हेमंत टकले यांचे नाव सुचविले. त्याला मुंबई अध्यक्ष चित्रा वाघ यांनी अनुमोदन दिले. त्यातून पक्षाच्या खजिनदार पदी आ.हेमंत टकले यांची एकमताने निवड करण्यात आली.यानंतर  तासगाव-कवठेमंहकाळ विधानसभा पोटनिवडणुकीत मोठ्या मताधिक्क्याने विजयी झालेल्या सुमनताई पाटील, नवी मुंबई महापालिका निवडणुकीत यशस्वी कामगिरी बजावणारे गणेश नाईक यांच्या अभिनंदनाचा ठराव राष्ट्रवादीचे नेते जयदत्त क्षीरसागर यांनी मांडला. या ठरावाला अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. नूतन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते सुमनताई पाटील व गणेश नाईक यांचा  सत्कार करण्यात आला.

प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर बोलताना सुनिल तटकरे म्हणाले पक्षासाठी आव्हानात्मक काळात मला राज्याचे नेतृत्व करण्याची पुन्हा एकदा संधी दिल्याबद्दल आदरणीय पवारसाहेब आणि पक्षातील इतर नेत्यांचे मी आभार मानतो. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घरोघरी पोहचवून पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत केली जाईल. प्रामाणिक काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनाच पक्षात संधी दिली जाईल.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कधीही धर्मांध शक्तीशी हातमिळवणी करणार नाही. सध्या एकीकडे नैसर्गिक संकटे तर दुसरीकडे सरकारच्या अन्यायी धोरणामुळे राज्यातील शेतकऱी भरडला जात आहे अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकर-यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. लवकरच पक्षाची जिल्हास्तरीय, प्रदेश पातळीवरील नवीन कार्यकारिणी घोषित होईल. नेमलेले पदाधिकारी, संपर्क नेते यांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेतले जातील.

या सर्वसाधारण सभेला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधिमंडळ नेते अजितदादा पवार, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, गटनेते जयंत पाटील, उपनेते जयदत्त क्षीरसागर, अरुणभाई गुजराथी, गणेश नाईक, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी.खा.पद्मसिंह पाटील,खा.विजयसिंह मोहिते-पाटील, खा.धनंजय महाडिक, खा.वंदनाताई चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष भास्करराव जाधव, राजेश टोपे, जितेंद्र आव्हाड, मुख्य प्रवक्ता नवाब मलिक, आ.सुमनताई पाटील, सचिन अहिर यांच्यासह दोन्ही सभागृहांतील आमदार ,प्रदेश प्रतिनिधी,जिल्हाध्यक्ष, स्थानिक स्वराज्य संस्थाचे प्रतिनिधी तसेच मान्यवर नेते, पदाधिकारी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित होते.