Published On : Mon, May 17th, 2021

प्राणवायू् निर्मितीत स्वयंपूर्ण होणे ही राष्ट्रीय जबाबदारी : ना. गडकरी

Advertisement

देवळीत राज्यातील पहिल्या प्राणवायू निर्मिती प्लाण्टचे उद्घाटन

नागपूर: प्राणवायू निर्मितीत स्वयंपूर्ण होणे ही राष्ट्रीय जबाबदारी असून संगम परिवाराने प्राणवायूचा राज्यातील पहिला प्लाण्ट सुरु करून सामाजिक दायित्वाचा परिचय दिला आहे. हा प्लाण्ट सुरु करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न हे ऐतिहासिक असल्याचे प्रतिपादन केंद्रीय महामार्ग वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

संगम परिवारातर्फे देवळी येथे (वर्धा) प्राणवायू निर्मितीच्या राज्यातील पहिल्या प्लाण्टचे उद्घाटन ना. नितीन गडकरी यांच्या हस्ते आभासी कार्यक्रमात करण्यात आले. या कार्यक्रमाला खा. रामदास तडस, योगेश मानधनिया, अनुराग सोनी आदी उपस्थित होते. या प्लाण्टमध्ये दररोज प्राणवायूच्या 500 सिलेंडरची निर्मिती होणार आहे.

याप्रसंगी बोलताना ना. गडकरी म्हणाले- 50 पेक्षा अधिक रुग्णशय्या असणार्‍या रुग्णालयांनी स्वत:चे प्राणवायूचे प्लाण्ट उभारावे अशा सूचना आपण जिल्हाधिकार्‍यांना दिल्या होत्या. तसेच कोविडच्या संक्रमणाची स्थिती पाहता प्राणवायू निर्मितीत आपण स्वयंपूर्ण असणे आवश्यक आहे. डॉ. पंजाबराव देशमुख रुग्णालय अमरावती यांना एक प्राणवायू निर्मितीचा प्लाण्ट आपण दिला असून येथून लिक्विड आणि हवेतून निर्माण होणारा असे दोन्ही प्रकारचे प्राणवायू निर्माण केले जातील. देवळीतील या प्लाण्टमुळे अनेकाचे जीव वाचतील. वर्धा येथील कस्तुरबा हॉस्पिटल आणि मेघेंचे हॉस्पिटल या दोन्ही रुग्णालयांना या प्लाण्टमधून प्राणवायूचा पुरवठा करता येईल, असेही ते म्हणाले.

देवळीत एक 100 रुग्णशय्येचे हॉस्पिटल तयार व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करून ना. गडकरी म्हणाले- या प्राणवायूच्या प्लाण्टमुळे सहा हजार लोकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे रोजगार उपलब्ध होणार ही आनंदाची बाब आहे. वर्धेतून जेनेटिक लाईफ सायन्सेसमधून रेमडेसीवीर इंजेक्शनची निर्मिती आता होऊ लागली आहे.

पुणे येथे 11 हजार व लातूर येथे हे इंजेक्शन पाठविण्यात आले आहे. यामुळे अनेकांचा जीव वाचणार आहे. तसेच कोविडनंतरच्या फंगल इन्फेक्शनमुळे डोळे, लंग्स, मेंदू निकामी होतात. त्यावर उपचारासाठी एम्फोटेरिसिन बी या इंजेक्शनची निर्मितीही वर्धेतून येत्या 5 जूनपर्यंत होईल. दररोज 30 हजार इंजेक्शनची निर्मिती होणार आहे. फंगल इन्फेक्शनसाठी 10 इंजेक्शन घ्यावे लागतात. अत्यंत कमी किंमतीत हे इंजेक्शन आता रुग्णांना उपलब्ध होतील. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवून लोकांचे प्राण वाचवणे हीच आजची आवश्यकता असल्याचेही ना. गडकरी म्हणाले. देवळी औद्योगिक वसाहतीत फक्त 21 दिवसात प्राणवायू निर्मितीचा हा प्रकल्प उभारण्यात आला.