
नागपूर : शेतकरी आत्महत्या-मुक्त विदर्भासाठी जलसंधारण हा एक प्रभावी उपाय ठरू शकतो, या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवत नागपुरात प्रथमच राष्ट्रीय स्तरावरील भव्य ‘नागपूर जलसंवाद-२०२६’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनात दि. १७ मे रोजी सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात होणाऱ्या या परिषदेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.
‘शेतकरी आत्महत्यामुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय’ या अत्यंत संवेदनशील आणि महत्त्वपूर्ण विषयावर देशभरातील नामवंत जलतज्ज्ञ, संशोधक, पद्म पुरस्कार विजेते कार्यकर्ते आणि विविध राज्यांमध्ये जलक्रांती घडवणारे तज्ज्ञ नागपुरात एकत्र येणार आहेत. जलसंधारणाच्या विषयावर इतक्या मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय मंथन नागपुरात प्रथमच होत असल्याने या परिषदेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
गेल्या २५ वर्षांपासून ‘पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था’ जलसंधारण क्षेत्रात सातत्याने कार्यरत असून संस्थेने उभारलेल्या ‘तामसवाडा मॉडेल’ची दखल देशभर घेतली जात आहे. गाव पातळीवरील लोकसहभाग, भूजल पुनर्भरण, नाला पुनरुज्जीवन, शाश्वत सिंचन आणि पाणी व्यवस्थापनाच्या माध्यमातून ग्रामीण भागात परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न संस्थेने केला आहे.
परिषदेच्या अध्यक्षस्थानी ना. श्री. नितीन गडकरी राहणार असून, देशभरातील जलचळवळीतील दिग्गज यावेळी नागपुरात सहभागी होणार आहेत. पद्मभूषण व पद्मश्री डॉ. अनिल प्रकाश जोशी (देहरादून), पद्मश्री उमाशंकर पांडेय (उत्तर प्रदेश), पद्मश्री सेठपाल सिंग (सहारनपूर), ‘इंडिया पाँडमॅन’ म्हणून प्रसिद्ध रामवीर तंवर (नोयडा), सेंटर फॉर वॉटर पीसचे अध्यक्ष संजय कश्यप, आसामचे के. के. छत्रधारा, नागालँडच्या स्वेडेविनो नात्सो यांच्यासह देशातील विविध राज्यांमध्ये जलसंधारण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अनेक तज्ज्ञ यावेळी अनुभव मांडणार आहेत. याशिवाय राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व अॅड. आशिष जयस्वाल यांची देखील विशेष उपस्थिती असणार आहे.
विशेष म्हणजे, हे सर्व मान्यवर आपल्या राज्यांमध्ये जलसंधारण, जलव्यवस्थापन, भूजल पुनर्भरण, तलाव संवर्धन आणि लोकसहभागातून जलक्रांती घडवून आणण्याचे मोठे काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुभवातून विदर्भासाठी नवे मॉडेल आणि व्यवहार्य उपाय समोर येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. जलसंधारणाच्या ठोस उपाययोजनांवर राष्ट्रीय स्तरावर मंथन व्हावे, हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे. राज्यभरातील शेतकरी, जलसंधारण क्षेत्रातील कार्यकर्ते, सरपंच, लोकप्रतिनिधी आणि अभ्यासक मोठ्या संख्येने या परिषदेत सहभागी होणार आहेत.
१८ मे रोजी जलक्रांती परिषद
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवार, दि. १८ मे रोजी जलक्रांती परिषद आयोजित करण्यात आली आहे. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सकाळी १० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते आमिर खान, नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची प्रमुख उपस्थिती असेल.








