Published On : Sat, Jul 14th, 2018

मध्य भारतातील कॅन्सर रुग्णांवरील दर्जेदार उपचारासाठी नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट मैलाचा दगड ठरेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Advertisement

नागपूर: मुंबईतील प्रख्यात टाटा कॅन्सर हॉस्पिटलवर रुग्णसेवेचा अतिरिक्त ताण आहे. या परिस्थितीत उपचारासाठी मध्य भारत व विदर्भाच्या दुर्गम भागातील कॅन्सर पीडितांना नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट दर्जेदार रुग्णसेवेसाठी मैलाचा दगड ठरू शकते. आज टाटा ट्रस्ट व एनसीआय यांच्यामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचा आपणास आनंद आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

मुंबईतील प्रख्यात टाटा मेमोरियल ट्रस्ट आणि नागपूरमधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट(एनसीआय) यांच्या दरम्यान आज एक सामंजस्य करार करण्यात आला. या करारानुसार विदर्भ व मध्य भारतातील रुग्णांना माफक दरात, जागतिक दर्जाचे उपचार व सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. 2012 पासून एनसीआय कॅन्सर रूग्णांसाठी कार्य करत असून आज झालेल्या सामंजस्य करारामुळे या भागातील गरजू, गरीब रुग्णांना कॅन्सरसारख्या दुर्धर आजारावर तातडीचा उपचार मिळणार आहे. जामठा परिसरामध्ये 25 एकरामध्ये उभारण्यात येत असलेल्या एनसीआयच्या नव्या इमारतीमध्ये आज हा सामंजस्य करार झाला.

यावेळी व्यासपीठावर टाटा ट्रस्टचे व्यवस्थापकीय विश्वस्त वेंकटरामन, टाटा ट्रस्टचे संचालक कैलाश शर्मा, नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटचे अध्यक्ष ॲड. सुनील मनोहर, सरचिटणीस शैलेश जोगळेकर, टाटा ट्रस्टचे वित्तीय अधिकारी आशिष देशपांडे, एनसीआयचे वैद्यकीय संचालक डॉ. आनंद पाठक, माजी खासदार अजय संचेती आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मुंबईमध्ये टाटा ट्रस्टच्या कॅन्सर हॉस्पिटलमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सरवर दर्जेदार उपचार केले जातात. या ठिकाणी प्रचंड गर्दी असते. दुर्गम भागातील नागरिक मुंबईत पोहोचू शकत नाही. त्यामुळे टाटा ट्रस्टच्या सहकार्याने, त्यांच्या निष्णात डॉक्टरांच्या सल्ल्याने व दर्जेदार उपचार पद्धतीने मध्य भारतातील व विदर्भातील दुर्गम भागातील नागरिकांना मदत करणे शक्य होणार आहे. मुंबईतील ताण कमी करण्यासाठी आजचा करार होत असून या ऐतिहासिक कराराचा साक्षीदार असल्याबद्दल आनंद होत आहे.

यावेळी त्यांनी प्रख्यात उद्योजक रतन टाटा यांच्या नेतृत्वात टाटा ट्रस्टने अनेक सामाजिक क्षेत्रात घेतलेल्या भरारीचा उल्लेख केला. यासोबतच शेती, आरोग्य, ग्राम विकास यामध्ये टाटा ट्रस्टचे उल्लेखनीय योगदान असल्याचे त्यांनी सांगितले. टाटा ट्रस्टसोबत एनसीआय यांचा हा करार दीर्घ काळ चालेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

तत्पूर्वी टाटा ट्रस्ट व्यवस्थापकीय विश्वस्त श्री वेंकटरामन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आज पश्चिम बंगाल (कोलकाता), झारखंड, कर्नाटक, ओडिसा यानंतर एनसीआयच्या मदतीने कॅन्सर पीडितांना जागतिक दर्जाच्या सुविधा नागपूरमधून उपलब्ध करता येत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री महोदयांनी ही संधी उपलब्ध केल्याबद्दल त्यांनी त्यांचे आभार मानले. मुंबईमध्ये एकाच ठिकाणी कॅन्सरच्या रुग्णांना सुविधा देणे शक्य नसल्यामुळे खाजगी आणि सार्वजनिक संस्थांच्या माध्यमातून देशभर टाटा ट्रस्ट कॅन्सर पीडितांच्या रुग्णसेवेसाठी अनेक करार करत आहेत. महाराष्ट्र सरकारने यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल त्यांनी आभार मानले.

एनसीआयचे वैद्यकीय संचालक डॉक्टर आनंद पाठक यांनी रुग्णालयच्या संदर्भात माहिती दिली. 2012 मध्ये धरमपेठ येथे सुरू झालेल्या एनसीआय इन्स्टिट्यूटचे मोठे स्वप्न आज अस्तित्वात येत आहे. आतापर्यंत या संस्थेमार्फत ६ हजार रुग्णांना मदत केली. 2017 मध्ये रुग्णालयाचा पहिला टप्पा सुरू झाला. जागतिक दर्जाचे उपचार नागपूरमध्ये सुरू करण्यात आले. लहान मुलांसाठी विशेष उपचार केंद्र सुरू केले आहे. 100 पेक्षा जास्त मुलांवर आतापर्यंत या ठिकाणी उपचार करण्यात आले आहे.

याशिवाय या इस्पितळामध्ये निष्णात डॉक्टर यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असेल, तसेच संशोधन कार्य देखील या केंद्राचे एक वेगळे वैशिष्ट्य ठरेल. ग्रामीण भागात कॅन्सर प्रतिबंध मोहिमेसाठी रुग्णालयाचा मोठा हातभार लागेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. मंडळाचे सरचिटणीस शैलेश जोगळेकर यांनी यावेळी प्रास्ताविक केले. सामंजस्य करार झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या नवनिर्मित रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी एका वार्डचाही शुभारंभ केला.