
नागपूर : काटोल तालुक्यातील राऊळगाव येथे असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या स्फोटक निर्मिती कारखान्यात १ मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोट प्रकरणात मृतांचा आकडा आता २२ वर पोहोचला आहे. जखमी झालेल्या आणखी दोन महिला कामगारांनी उपचारादरम्यान प्राण गमावल्याने या दुर्घटनेची भीषणता अधिक स्पष्ट झाली आहे.
माहितीनुसार, गंभीर जखमी असलेल्या आम्रपाली अनिल कालसर्पे (३८) यांचे ७ मार्चच्या रात्री नागपूरमधील रुग्णालयात निधन झाले. तर रोशनी सूर्यकांत उमाठे (२८) यांचा रविवारी दुपारी सुमारास ऑरेंज सिटी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या दोन मृत्यूंमुळे स्फोट दुर्घटनेतील मृतांची संख्या २२ वर पोहोचली आहे.
१ मार्च रोजी सकाळी सुमारे ७ ते ८.३० या वेळेत कारखान्यातील १६-बी आणि २०-बी या नॉन-क्रिमिंग विभागात सलग काही जोरदार स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या स्फोटांचा आवाज अनेक किलोमीटरपर्यंत ऐकू आल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
या दुर्घटनेत आतापर्यंत २० महिला आणि दोन पुरुष कामगारांचा मृत्यू झाला असून २० हून अधिक कामगार जखमी झाले आहेत. जखमींवर नागपूरमधील विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
दरम्यान, मृतांच्या कुटुंबीयांनी प्रशासनाकडे नुकसानभरपाई आणि योग्य मदतीची मागणी केली आहे. या भीषण घटनेनंतर स्फोटक उद्योगांमधील सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागरिक, सामाजिक संघटना तसेच काही स्थानिक पदाधिकाऱ्यांनी अशा कारखान्यांमध्ये सुरक्षा नियम अधिक कडक करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.








