नागपूर: नागपूरकरांनी प्रवासासाठी मेट्रोचा अधिकाधिक वापर करावा, असा आमचा मानस असल्याचे मत महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांनी व्यक्त केले. यामुळे शहरातील वाहतुकीवरचा ताण कमी होईल. सध्या नागपूरमध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर केवळ १५% होतो. हे प्रमाण ३० टक्क्यांवर जावे अशी इच्छा दीक्षित यांनी व्यक्त केली. पत्रकारांसाठी मेट्रोच्या एका खास जॉयराईड नंतर हॉटेल प्राईड येथे त्यांनी पत्रकारांशी औपचारिक संवाद साधला.
रामटेक, काटोल, भंडारा आणि वर्धा या शहरांना लवकरच मेट्रोने नागपूरशी जोडण्यात येणार असल्याची माहिती महामेट्रोचे महाव्यवस्थापक बृजेश दीक्षित यांनी दिली. महामेट्रो कार्पोरेशन लवकरच भारतीय रेल्वेबरोबर एका सामंजस्य करार करणार असून त्याद्वारे आसपासच्या भागांना नागपूरशी जोडण्यासाठी ३ कोचेसच्या विशेष ट्रेन्स सुरु केल्या जातील, असे ते म्हणाले.
सदर ट्रेन्स ह्या रेल्वेच्याच ट्रॅक्सवर धावतील. परंतु त्यांच्या संचलनाची जबाबदारी मात्र महामेट्रोकडे असेल. या ट्रेनमधून एकाच वेळी १००० प्रवासी नागपूरला ये-जा करू शकतील. सदर प्रवाशी नागपूरला उतरल्यानंतर मेट्रोमध्ये बसून आपल्या गंतव्यावर जातील. त्यामुळे शहरातील वाहतुकीचा भार कमी होईल.
सीताबर्डीपर्यंतचा मार्ग तयार होईस्तोवर मेट्रोच्या अधिकृत फेऱ्या सुरु होणार नसल्याचा खुलासा देखील दीक्षित यांनी केला. हे काम पूर्ण होण्यास आणखी ७-८ महिन्यांचा कालावधी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान नागरिकांसाठी जॉयराइड्सचे आयोजन मात्र यापुढेही होत राहील असेही त्यांनी स्पष्ट केले.