नागपूर : एकीकडे नागपूर शहरातील अनेक वस्त्यांमध्ये नागरिकांच्या घशाला कोरड पडली आहे. घरातील नळाला पाणी येण्यासाठी नागरिकांना प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे फुटाळा तलावातील फाऊंटन सुरू ठेवण्यासाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याची स्वतंत्र जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे ‘नागपूरकरांच्या घशाला पाणी नाही, पण फुटाळा फाऊंटनला शुद्ध पाणी कशासाठी?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.
फुटाळा तलावातील पाण्यात गाळ आणि घाण साचल्याने फाऊंटन सुरू केल्यानंतर ही घाण नोजलमध्ये अडकते आणि फाऊंटन बंद पडते. ही समस्या टाळण्यासाठी आता फाऊंटनला थेट शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकली जात असून ती फाऊंटनशी जोडली जाणार आहे.
नागरिकांना चार तासांचे पाणी, फाऊंटनसाठी मात्र शुद्ध पाणी-
या निर्णयामुळे फुटाळा परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. परिसरातील वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असताना फाऊंटनसाठी शुद्ध पाण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जात असल्याने प्रशासनाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
आज नागरिकांना चार तास पाणी मिळते; उद्या फाऊंटनसाठी पाणी वळवून हेच चार तास दोन तासांवर आणले तर? अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. आधीच पाण्याची कमतरता असताना फाऊंटनसाठी शुद्ध पाण्याचा वापर सुरू झाल्यास सर्वसामान्यांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची चिंता परिसरातील नागरिकांना आहे.
फाऊंटन महत्त्वाचे की नागरिकांचे पाणी?
फुटाळा हे नागपूरच्या सौंदर्यात भर घालणारे पर्यटनस्थळ आहे. फाऊंटन सुरू ठेवण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे असले तरी त्यासाठी पिण्याचे शुद्ध पाणी वापरण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, हा खरा प्रश्न आहे.
फाऊंटनच्या नोजलमध्ये घाण जाऊ नये म्हणून तलावातील पाण्यावर प्रक्रिया करण्याचे पर्याय उपलब्ध असताना थेट पिण्याच्या पाण्याची जलवाहिनी फाऊंटनपर्यंत नेण्याची गरज काय, असा सवालही नागरिक करत आहेत. नागपूर तहानलेले असताना फुटाळा फाऊंटनला शुद्ध पाणी देण्याचा हा कोणता विकास? घरातील नळाला पाणी नाही, पण फाऊंटनसाठी शुद्ध पाण्याची जलवाहिनी का? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाने नागपूरकरांना देणे गरजेचे आहे.




