Published On : Thu, Oct 4th, 2018

नागपुरातील धवड दाम्पत्य 67 दिवसांपासून बेपत्ता

Advertisement

नागपूर : नागपुरातील प्रख्यात वकील भैयासाहेब धवड आणि त्यांच्या पत्नी वनिता धवड गेल्या 67 दिवसांपासून बेपत्ता आहे. कुटुंबीय, शेजारी, पोलीस धवड दाम्पत्याचा शोध घेत असून त्यांच्या बेपत्ता होण्यामागचं गूढ दिवसागणिक वाढत आहे. धक्कादायक बाब म्हणजे नावाजलेले वकील असलेले भैयासाहेब आणि त्यांची गृहिणी पत्नी वनिता घर सोडताना अंगावरच्या कपड्यांशिवाय कोणतीही वस्तू सोबत घेऊन गेलेले नाहीत. सर्व ओळखपत्र, एटीएम कार्ड्स, बँक पासबुक, कपडे, चप्पल एवढंच काय तर चष्मे आणि रोज आवश्यक असलेली औषधंही घरीच ठेवून हे दाम्पत्य अज्ञात ठिकाणी निघून गेल्याने नागपुरात खळबळ माजली आहे.

अपघातासंदर्भात विमा क्लेम्ससाठीचे नागपुरातील प्रख्यात वकील भैयासाहेब धवड (वय 62 वर्ष) आणि त्यांच्या पत्नी वनिता धवड 29 जुलैच्या रात्रीपासून बेपत्ता आहेत. अजनी पोलीस स्टेशन अंतर्गत वंजारीनगर परिसरातील लक्ष्मी प्रयाग अपार्टमेंटमध्ये गेल्या 14 वर्षांपासून राहणारे हे दाम्पत्य सर्वांचे आवडते शेजारी होते. सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारे निर्व्यसनी भैय्यासाहेब आणि वनिता धवड 29 जुलैच्या संध्याकाळपर्यंत अपार्टमेंटमध्ये सर्वांना दिसले. मात्र, 29 जुलैच्या रात्री कोणाला काहीही न सांगता हे दाम्पत्य बेपत्ता झालं. ही घटना घडली त्या दिवशी धवड दाम्पत्याचा एकुलता एक मुलगा मृणाल (वाशिमला बँकेत नोकरी करतो) नागपुरातील घरातच होता. पहिले दोन-तीन दिवस शेजाऱ्यांना काहीच समजलं नाही. मात्र, एका दिवशी अपार्टमेंटमध्ये पोलीस आले तेव्हा धवड दाम्पत्य बेपत्ता असल्याचं शेजाऱ्यांना कळलं.

पोलिसांनी धवड कुटुंबियांच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत फ्लॅटची तपासणी केली, तेव्हा धवड दाम्पत्याची प्रत्येक वस्तू घरीच आढळली. घर सोडताना भैयासाहेब आणि त्यांच्या पत्नी वनिता यांनी अंगावरच्या कपड्यांशिवाय काहीच नेलेलं नाही. दोघांची सर्व ओळखपत्र (आधार कार्ड, इलेक्शन कार्ड, इतर आयडी), बँकेचे सर्व एटीएम कार्ड्स, पासबुक त्यांनी घरीच ठेवले आहे. रोज लागणाऱ्या अत्यावश्यक औषधं, त्यांचे सर्व प्रिस्क्रिप्शन्सही नेलेलं नाही. धक्कादायक म्हणजे भैयासाहेब यांना सतत चष्मा लावायचे, मात्र तोही घरीच ठेवल्याचं आढळलं. मागील 12 वर्षांपासून शेजारी राहणारे आणि प्रत्येक सुख-दुःखात एकमेकांची साथ देणारं दाम्पत्य असं बेपत्ता झाल्याने शेजारी निराश झाले आहेत. एकुलत्या एक मुलाच्या लग्नानंतर घरात सर्वकाही आलबेल नव्हतं, एवढीच माहिती शेजाऱ्यांना आहे.

गेल्या दोन महिन्यात पोलिसांनी या प्रकरणी बरीच मेहनत घेतली. नागपूरचं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पोलिसांनी पिंजून काढलं. इतर राज्यांच्या पोलिसांना भैयासाहेब आणि वनिता धवड यांची माहिती दिली. मात्र, दोघे कुठे गेले, त्यांच्यासोबत नेमके काय झालं, हे कळू शकलं नाही. मात्र, मुलाच्या लग्नानंतर धवड कुटुंबात काही तणाव होता, असं पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आलं आहे. या दाम्पत्याबद्दल काहीही कळल्यास नागरिकांनी नागपूर पोलिसांना सांगावं, असं आवाहन पोलिसांनी केले आहे.

धकाधकीच्या जगात आयुष्य जगताना मध्यम वयातील अनेक दाम्पत्य विविध तणावांना सामोरे जातात. कुटुंबातील ताण तणाव, विविध पिढ्यांमध्ये वैचारिक अंतर, नोकरी व्यवसायानिमित्ताने दुरावत जाणारी मुलं, त्यामुळे येणारा एकटेपणा अशा वेगवेगळ्या कारणांनी अनेक वृद्ध दाम्पत्य नैराश्येच्या गर्तेत जातात. मात्र, सुखवस्तू आयुष्य जगणाऱ्या धवड दाम्पत्याच्या बाबतीत यापैकी नेमकं काय झालं, हे कोणालाच कळलं नाही.

नागपुर पोलिसांनी सर्व कड़े शोधा शोध घेतली परंतु अद्याप ही धवड दंपती सापडुन आल्या नाही , पोलिस उपायुक्त परिमंडल क्रमांक 4 नीलेश भरने यांनी जनतेला आव्हान केले की जर कोन्हालाही धवड दंपति यांची कोणतीही माहिती मिळाल्यास जनतेने पोलिसांना फोन करावे।

फ़ोन करण्याकरती अजनी चे पोलिस निरीक्षक शैलेश शंखे मोबाईल क्रमांक 99011041821 , पोलिस उपनिरीक्षक जाधव 9765860359 किंवा अजनी पोलिस स्टेशन क्रमांक 0712 -2746555 या क्रमांक वर संपर्क करावे ,संपर्क करणाऱ्या वेक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल , घटनयाची गांभीर्य बघुन अजनी पोलिसांनी तपासाची दिशा बदलवली आहे , विश्वसनीय सुत्रा नुसार धवड दंपतीचे घात पात होण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण 67 दिवस लोटल्या नंतर सुद्धा त्यांचा कुठे ही ठाव ठिकाना लागला नाही अजनी पोलिसांना धवड दंपतीचा शोध घेणे फार अवघड होत आहे त्यांना कुठेही अद्द्याप पर्यन्त सुगाव लागलेला नाही