
नागपूर :नागपुरात प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वादाने भीषण वळण घेत एका १७ वर्षीय तरुणाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अल्पवयीन मुलगी आणि दोन किशोरांमधील तणाव, संशय आणि ईर्ष्येने अखेर रक्तरंजित स्वरूप धारण केलं.
कलमना परिसरात घडलेल्या या घटनेमुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावरून सुरू झालेली ओळख आणि त्यातून निर्माण झालेले गुंतागुंतीचे संबंध एका निष्पाप जीवासाठी घातक ठरले.
कॉलनंतर घराबाहेर… आणि परतलाच नाही-
मृत जोहरान मुस्तफा शेख (१७) याला मंगळवारी रात्री इंस्टाग्रामवरून कॉल आला होता. कॉल करणारा युवकही अल्पवयीन असल्याचं समोर येत आहे. मित्राला भेटून येतो असं सांगून जोहरान घराबाहेर पडला; मात्र त्यानंतर तो जिवंत परतलाच नाही.
मैदानात नेऊन धारदार शस्त्राने हल्ला-
वाजपेयी नगर परिसरातील अशराफी मशिदीजवळील मैदानात रात्री उशिरा जोहरानवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. डोकं आणि मानेवर वारंवार वार करण्यात आल्याने तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
प्रेमप्रकरणातून वाढला वाद-
प्राथमिक तपासात एका अल्पवयीन मुलीमुळे दोन्ही किशोरांमध्ये वाद निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. एकतर्फी प्रेम, संशय आणि वाढता तणाव यामुळेच ही घटना घडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
आईच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल-
मृतकाच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी अनुराग यादवविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 103(1) अंतर्गत प्रकरण नोंदवण्यात आलं असून आरोपी अद्याप फरार आहे.
सोशल मीडियावरील नात्यांबाबत पुन्हा प्रश्न-
या घटनेमुळे अल्पवयीन मुलांमध्ये सोशल मीडियावर तयार होणाऱ्या नात्यांच्या धोक्यांबाबत पुन्हा चिंता व्यक्त होत आहे. ऑनलाईन ओळखी कधी घातक ठरतील, हे सांगणं कठीण झालं आहे.या प्रकरणाचा पुढील तपास कलमना पोलीस करत आहेत.
By Ravkant Kamble








