Published On : Fri, Nov 10th, 2017

जलयुक्त शिवार अभियानामध्ये नागपूर जिल्हा विभागात प्रथम

Advertisement

· 432 गावे जलपरिपूर्ण, 64 हजार 393 टीएमसी पाणीसाठा
· काटोल तालुका विभागात आघाडीवर
· 2015-16 मध्ये 313 गावात 5 हजार 51 कामे पूर्ण
· 24 हजार 441 हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन


नागपूर: जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जिल्हयात मागील दोन वर्षात 498 गावांपैकी 432 गावे जलपरिपूर्ण झाली असून या कामामुळे 24 हजार 411 हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचनाच्या सुविधा निर्माण झाल्या आहेत. अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना पिकांना जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून निर्माण झालेल्या 64 हजार 393 सस्त्र घमी पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे आवश्यकतेनुसार पाणी देणे सूलभ झाले आहे. विभागात 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल नागपूर जिल्हा प्रथम आला आहे.

पिण्याच्या पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी तसेच जलयुक्तच्या माध्यमातून कोरडवाहू क्षेत्रातील गावे जलपरिपूर्ण करण्याच्या दृष्टीने जिल्हयात सन 2015-16 या वर्षात जलयुक्त शिवार अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. शासकीय विभाग, तसेच विविध संस्था तसेच लोकसहभागातून पहिल्याच वर्षी 313 गावाची निवड करण्यात आली होती. त्यानुसार मृद व जलसंधारणाची 5 हजार 51 कामे पूर्ण करण्यात आली असून सुमारे 61.88 लक्ष घनमीटर नाल्यातील व तलावातील गाळ काढण्यात आला.

जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत विभागातील कामांचा आढावा जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांनी घेतला. त्याप्रसंगी नागपूर जिल्हयात जलसंधारणाच्या कामामुळे निर्माण झालेल्या संरक्षित सिंचन तसेच जलसाठ्यात झालेली वाढ या कामांची विशेष दखल घेवून जिल्हयाला विभागीय स्तरावरील प्रथम पुरस्कार देण्यात आला. तसेच विभागात काटोल तालुक्यातील वैशिष्ट्यपूर्ण कामामुळे प्रथम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. राज्यात तसेच विभागातही जिल्हयाने केलेल्या जलयुक्त शिवार अभियानाच्या कामामुळे विभागात सर्वाधिक काम नागपूर जिल्हयात पूर्ण झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिली.


जलयुक्त शिवार अभियानअंतर्गत भूजलाचे पुनर्भरण व जमिनीवर साठवणूक वाढवून संरक्षित सिंचन क्षमता निर्माण करण्यासाठी मातीनाला बांध, सीसीटी, दगडीबांध, गॅगयीन बंधारे, भात खचरे, सिमेंट बंधारे व इतर विविध कामे घेण्यात आली. जिल्हयात मागील दोन वर्षा 498 गावांची निवड कण्यात आली त्यापैकी 432 गावे जलपरिपूर्ण झालेली आहे. सुमारे 7 हजार 966 कामे पूर्ण झाली असून 113.6 लक्ष घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यामुळे 64 हजार 993 सस्त्र घमी (टीएमसी) पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळेच 24 हजार 411 हेक्टर क्षेत्रात अतिरिक्त संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे. या कामांवर 212 कोटी 65 लक्ष रुपये खर्च झाले आहे.

जलयुक्त शिवार अभियानाला विविध शासकीय व निमशासकीय संस्थांचा सहभाग लाभला असून आर्ट ऑफ लिव्हींग संस्थाद्वारे हिंगणा तालुक्यातील तीन गावात 22 किलोमीटर लांबीचे जुन्या बंधाऱ्यातील नाला खोलीकरणाचे 3 लक्ष 30 हजार घनमीटर काम करण्यात आले असून या कामाचे मुल्य 1 कोटी 32 लक्ष रुपये आहे. या कामासाठी महात्मा ज्योतीबा फुले जलभूमी संधारणातून 17 लक्ष रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थातर्फे 56 गावात 143 शेततळे पूर्ण करण्यात आले तसेच सिध्दी विनायक संस्थेतर्फे काटोल व नागपूर तालुक्यात प्रत्येकी 5 नालाखोलीकरणाचे कामे पूर्ण करण्यात आले आहे. या कामामुळे भूजलपातळी चार ते पाच फुटाने वाढ झालेली आहे.
जलयुक्त शिवार अभियानामध्ये 2016-17 यावर्षात 185 गावांपैकी 119 गावे जलपरिपूर्ण झाली असून 2 हजार 915 कामे पूर्ण झाली आहे. या कामामुळे 22 हजार 658 टीएमसी पाणी निर्माण असून 7 हजार 392 हेक्टर क्षेत्रात संरक्षित सिंचन निर्माण झाले असून या कामांवर 72 कोटी रुपये खर्च झाले आहे.


संपूर्ण पाणलोट क्षेत्राच्या विकासासाठी 220 गावाची निवड
जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत गाव हे घटक या ऐवजी गावातील पाणलोट क्षेत्रात हे घटक म्हणून संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा विकास करताना माथा ते पायथा या तत्वानुसार कामाची निवड करण्यात आली. 2017-18 या वर्षात नागपूर जिल्हयातील 220 गावाची निवड करण्यात आली आहे. त्यानुसार गावनिहाय नियोजन करुन या आराखडयास ग्रामसभेची मान्यता घेण्यात आली आहे.

माथा ते पायथा या तत्वावर निवडण्यात आलेल्या गावांमध्ये 3 हजार 419 कामे प्रस्तावित करण्यात आली असून या कामांवर 150 कोटी 84 लक्ष रुपयाचा खर्च अपेक्षित आहे. जिल्हयात 277 गावांमध्ये जलयुक्त शिवार अभियानाची कामे गावाच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्र विकासानुसार सुरु झाली आहे. त्यामुळे 70 टक्के क्षेत्र विकासाची कामे तसेच खालच्या भागात 30 टक्के ड्रनेज लाईन टिटमेंटची कामे घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. या कामांमुळे निर्माण होणाऱ्या जलसाठ्यामध्ये गाळ साचणार नाही.

काटोल तालुका विभागात प्रथम
जलयुक्त शिवार अभियानामध्ये काटोल तालुक्यात केलेल्या नालाखोलीकरणासह सिमेंट नालाबंधारा, तसेच तलावांचे खोलीकरण आदी कामांमुळे संत्रा उत्पादक क्षेत्रात भूजलाच्या पातळीत लक्षणिय वाढ झाली आहे. काटोल तालुक्यात घेण्यात आलेल्या विविध कामांमुळे काटोल तालुका विभागात प्रथम आला आहे.