Published On : Mon, Jul 20th, 2015

नागपूर : मागील दहा वर्षात 1265 नक्षलवादी व समर्थकांना अटक

Advertisement


चळवळीतील वरिष्ठ नक्षल कॅडरचा समावेश 

नागपूर। राज्यातील अतिसंवेदनशील असलेल्या नक्षलग्रस्त भागात पोलिसांच्या आक्रमक रणनितीमुळे नक्षल चळवळीचा कणा मोडला असून बंदुकीच्या जोरावर आदिवासी बांधव व गरीब जनतेची दिशाभूल करणा-या नक्षलवाद्यांना अटक करण्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर यश आले आहे. त्याचीच फलश्रृती म्हणून मागील दहा वर्षात पोलिसांनी 1265 नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक केली आहे. विशेष म्हणजे यात महाराष्ट्र स्टेट कमिटी सदस्य, डिव्हीजनल सेक्रेटरी, एरिया कमांडर, दलम कमांडर अशा वरिष्ठ नक्षल कॅडरचा समावेश आहे.

पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात 1980 च्या दशकात नक्षल चळवळीला सुरुवात झाली. आदिवासी जनतेच्या मागासलेपणाचा फायदा घेत हे नक्षलवादी आदिवासी बांधवांना भूलथापा देण्याचे काम करीत आहे. लोकशाहीत मिळालेले स्वराज्य खोटे आहे, असा अपप्रचार नक्षलवादी वारंवार करीत असतात. ऐवढेच नव्हे तर भोळ्या-भाबळ्या आदिवासी बांधवांना दहशतीत ठेवून त्यांना मारहाण करणे, आदिवासी बांधवांची हत्या करणे, ठेकेदारांकडून खंडणी वसुल करणे, रस्त्यांची नासधुस करणे, शासकीय विकास कामे होऊ न देणे, वाहनांची जाळपोळ करणे, दुरसंचार टॉवर व साहित्याची जाळपोळ करणे तसेच शहरी भागात विविध सामाजिक संघटनांच्या नावावर नक्षल विचारांचा प्रसार व प्रचार करून समाजात तेढ निर्माण करणे, अशांतता निर्माण करणे, असे गुन्हेगारी कार्य नक्षलवादी करीत आहेत. अशा नक्षलवाद्यांवर कायमस्वरूपी लक्ष ठेवून मोठ्या शिताफीने त्यांना अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले आहे.

सन 2005 मध्ये महाराष्ट्र स्टेट कमिटी सदस्य व्ही शंकर आझाद उर्फ मदनलाल कनकय्या आणि सिरोंचा महादेवपूर दलम कमांडर रमाकांत उर्फ श्रीनिवास सिन्नू मलय्या चौधरी याच्यासह 302 नक्षलवादी व त्यांचे समर्थक, सन 2006 मध्ये 93, सन 2007 मध्ये उत्तर गडचिरोली – गोंदियाचा डिव्हीजनल सेक्रेटरी मुरली उर्फ महेश उर्फ अशोक सत्या रेड्डी, महाराष्ट्र स्टेट कमिटी सेक्रेटरी श्रीधर उर्फ विष्णु श्रीनिवासन आणि महाराष्ट्र स्टेट कमिटी सदस्य विक्रम उर्फ प्रदीप उर्फ स्टॅलीनॉस गोन्सालव्हीस याच्यासह 138, सन 2008 मध्ये दलम कमांडर सगुणा उर्फ संगीता गौजे सत्यजय उर्फ मल्लेराजारेड्डी, जयअक्का उर्फ मुतक्का गौपी नैताम, करप्पा उर्फ मदनय्या पोट्टी शंकर आत्राम, संतोष उर्फ जगदीश उर्फ लक्ष्मण जंगु मडावी याच्यासह 124, सन 2009 मध्ये डिव्हीजनल कमांडर विश्वनाथ उर्फ गणु उर्फ गणपत राजा कुळमेथे याच्यासह 169, सन 2010 मध्ये महाराष्ट्र स्टेट कमेटी सदस्य प्रभाकर पदा भिमरय्या सुर्या देवरा, भीमराव मंगल भोवते उर्फ भानु उर्फ भास्कर, दलम कमांडर श्रीनिवास उर्फ मंगन्ना अशोक सबाराम बोरला याच्यासह 92, सन 2011 मध्ये महाराष्ट्र स्टेट कमेटी सदस्य अंजल उर्फ ईसकारा उर्फ कविता उर्फ सुनिता पाटील उर्फ रमा मिलींद तेलतुंबडे, दलम कमांडर सोमाजी उर्फ कोदिया उर्फ संतोष आयतु मडावी याच्यासह 120 नक्षलवादी व समर्थकांना अटक करण्यात आली.

सन 2012 मध्ये दलम कमांडर सरदु उर्फ सरजु घोरू झोरे, प्रकाश उर्फ देविदास उर्फ अडवे उर्फ मुरा गावडे, बिच्छु उर्फ बिरजु आसिफ रामा उईके, बदरू राजवंशी शिरसाम उर्फ दिनेश उर्फ क्रिष्णा याच्यासह 126, सन 2013 मध्ये 58, सन 2014 मध्ये डिव्हीजनल कमेटी सदस्य राजु उर्फ जेटुराम बुधराम धुर्वा, दलम कमांडर श्यामलाल उर्फ कमलेश रूपसिंग गावडे, एरिया कमिटी सदस्य अरूण भानुदास भेलके, कांचन अरूण भेलके, कमांडर डुंगा उर्फ येशु उर्फ वसंतराव बापु टेकाम याच्यासह 29 नक्षलवादी आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी अटक केली. तर 28 फेब्रुवारी 2015 पर्यंत डिव्हीजनल कमेटी सदस्य शिवाजी उर्फ मैनु आयवा याच्यासह एकूण 9 नक्षलवादी व त्यांच्या समर्थकांना अटक करण्यात पोलिस यशस्वी झाले आहेत.

नक्षलग्रस्त भागात विकासकामे राबवून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचे शासनाचे ध्येय आहे. त्यानुसार नक्षलग्रस्त जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात शासनाच्या वतीने विविध विकास कामे राबविण्यात येत आहेत. त्यातच नक्षल चळवळीत दिशाभुल झालेल्या आदिवासी तरूण-तरूणींना जगण्याची संधी देत शासनाने 2005 पासून आत्मसमर्पण योजना सुरू केली. नक्षल चळवळीतील आत्तापर्यंत 479 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून लोकशाही मार्गाचा स्वीकार केला आहे. आत्मसमर्पण करणा-या या नक्षलवाद्यांना शासनाकडून मोठ्या प्रमाणावर लाभ मिळत आहे. त्यामुळे आत्मसमर्पण करणा-या नक्षलवाद्यांचे प्रमाण वाढत चालले आहे.

File Pic

File Pic