नागपूर : राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये तीन वर्षांपासून प्रशासक राज सुरू असून, मुंबई, नागपूर, पुणे यांसह एकूण १० महापालिकांमध्ये लोकनियुक्त सत्ता नाही. मात्र आता या निवडणुकांचा मार्ग आणखी लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने नुकतीच प्रभाग रचनेबाबत नवीन अधिसूचना काढली असून, यामध्ये अंतिम अहवाल सादर करण्याची तारीख वाढवण्यात आली आहे. त्यामुळे महानगरपालिका निवडणुका २०२६ मध्येच होणार, हे जवळपास निश्चित झाले आहे.
अधिसूचनेनुसार बदललेला वेळापत्रक:
११ ते १६ जून २०२५: गणना गटांची मांडणी
१७ जून ते २४ जुलै: प्रारूप प्रभाग रचना तयार करणे
१ ते ५ ऑगस्ट: प्रारूप रचना नगरविकास विभागाकडे सुपूर्त करणे
६ ते ११ जुलै: प्रारूप निवडणूक आयोगाकडे प्रस्तावित करणे
त्यानंतर: प्रारूप प्रसिद्ध करून जनतेकडून हरकती व सूचना मागवणे
२९ ऑगस्ट ते ८ सप्टेंबर: आलेल्या हरकतींवर सुनावणी
९ ते १५ सप्टेंबर: अंतिम प्रभाग रचना नगरविकास विभागाला सादर
१६ ते २२ सप्टेंबर: अंतिम प्रभाग रचना निवडणूक आयोगाला सुपूर्त
३ ते ६ ऑक्टोबर: अंतिम प्रभाग रचना जाहीर करणे
निवडणुका आता थेट २०२६ मध्ये?
अंतिम प्रभाग रचनेनंतर आठ दिवसांत ओबीसी, अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींसाठी आरक्षण जाहीर केले जाईल. त्यानंतर नवीन मतदार यादी तयार करण्यात दीड ते दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे संपूर्ण प्रक्रिया पार पडून निवडणुका घेण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेतल्यास, मनपा निवडणुका आता थेट नववर्षात म्हणजेच २०२६ मध्ये होणार,अशी चर्चा सुरु आहे.