लेदर निर्यातदारांशी व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद
नागपूर: निर्यात वाढविण्यासाठी एमएसएमईचे प्राधान्य राहणार आहे. लेदर क्लस्टर हे आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे क्षेत्र आहे. या क्षेत्राच्या माध्यमातून लेदरच्या वस्तू निर्मितीत अद्ययावत तंत्रज्ञान आणून निर्यात कशी वाढेल यासाठीच आपण प्रयत्न करणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक,परिवहन व लघु-सूक्ष्म व मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
लेदर निर्यातदारांच्या परिषदेतील सदस्यांशी गडकरी यांनी आज दुपारी त्यांच्या निवासस्थानाहून व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून संवाद साधला. केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले- या व्यवसायात अत्यंत गरीब मजूर आहेत. घरच्या घरी लेदरचा व्यवसाय करतो. ज्या ठिकाणी व्यवसाय असतो, त्या ठिकाणी कोणत्याही सुविधा-व्यवस्था नसतात. त्याऐवजी राष्ट्रीय महामार्गांचे निर्माण होत असताना रस्त्याच्या लगत असलेल्या जागांवर लेदर क्लस्टर आपण निर्माण करू शकतो.
तेथे हे लोक व्यवसाय करू शकतात. तेथे लागणारी जागा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण भूसंपादित करून देईल. दिल्ली आणि त्या भागातील रस्त्यांलगत असलेली जागा महागडी जागा आहे. सध्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मुंबई दिल्ली महामार्ग तयार करीत आहे. हा महामार्ग जंगल आणि आदिवासी भागातून जात आहे. या रस्त्यालगत असलेली जमीन कमी किमतीत उपलब्ध होऊ शकते. अशा जमिनीवर लेदर क्लस्टर तयार होऊ शकते, असेही ते म्हणाले.
तसेच एमएसएमईमार्फत शासन असा प्रयत्न करीत असल्याचे सांगताना गडकरी म्हणाले- रस्त्यालगत भूसंपादित केलेल्या जमिनीवर लहान लहान उद्योगांचे क्लस्टर निर्माण होणे अपेक्षित आहे. मुंबई दिल्ली रस्त्यालगत लेदर क्लटर निर्माण करता आले तर या ठिकाणी रोड, पोर्ट, रेल्वे, पाणी, ऊर्जा या सुविधा उपलब्ध होऊ शकतात. तसेच लॉजिस्टीक पार्क, स्मार्ट सिटी, स्मार्ट व्हिलेज तयार होऊ शकतात.
लेदर क्लस्टरमध्ये काम करणार्या मजुरांसाठी घरेही बांधून दिली जाऊ शकतात. शासनाच्या विविध योजनांचा लाभ येथे घेता येऊ शकतो. टप्प्याटप्प्याने ही कामे होऊ शकतात. अन्य ठिकाणी विखुरलेला हा उद्योग एकाच ठिकाणी सर्व सुविधा उपलब्ध करून स्थानांतरित करता येऊ शकतो. यासाठी या व्यवसायाला एमएसएमईची मदत मिळेल. याशिवाय निर्यातीच्या दृष्टीने जे प्रयत्न करणे आवश्यक आहे, ते सर्व प्रयत्न आपण करू असे आश्वासन गडकरी यांनी चर्चेदरम्यान दिले.
सध्याच्या स्थितीत सर्वच जण अडचणीचा सामना करीत आहेत. कोरोना आणि आर्थिक अशा दोन स्तरावर लढाई करावी लागत आहे. पण आत्मनिर्भर भारत या योजनेतून अनेक उद्योागांना, उद्योजकांना दिलासा मिळत आहे. कौशल्य, प्रशिक्षण आणि संशोधन या संदर्भात एक प्रस्ताव लेदर निर्यातदारांनी तयार करून शासनाला द्यावा त्यातही आपण सहकार्य करू असेही गडकरी म्हणाले.