Published On : Sun, Jul 14th, 2019

रोजगार आणि नागरी सुविधांसाठी सर्वाधिक निवेदने

Advertisement

नागपूर: तरुणांसह प्रौढांनीही रोजगार मिळावा यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनातून मागणी केली. जनतेच्या भेटीगाठी कार्यक्रमात आज रविभवन येथे पालकमंत्र्यांच्या कार्यक्रमात रोजगार आणि नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठ़ी सर्वाधिक निवेदने नागरिकांनी दिली. नागरी सुविधांसाठी प्रत्येक निवेदनावर पालकमंत्र्यांनी निर्देश लिहून संबंधित विभागाकडे पाठविण्यास सांगितले.

रविभवनात आज झालेल्या या कार्यक्रमाला 300-400च्या आसपास नागरिक आले होते. सकाळी 9 वाजेपासूनच नागरिक व महिलांनी रविभवनात गर्दी केली. एका रांगेत प्रत्येकाने निवदेन पालकमंत्र्यांना सादर करायचे व आपले गार्‍हाणे मंत्रिमहोदयांपुढे मांडायचे. या पध्दतीने ही निवेदने स्वीकारण्यात आली. या महानगर पालिकेमार्फत आणि ग्रामीण भागात जिल्हा परिषद आणि नगर पंचायती मार्फत मिळणार्‍या सुविधा या अपुर्‍या पडू लागल्या असल्यामुळे या संदर्भातील निवेदने अधिक होते.

वस्त्यांमधील अंतर्गत रस्ते, कचरा उचचला जात नाही, विहिरींना पाणी नाही, नळ येत नाही, पथदिवे बंद असतात, विजेचे बिल अधिक आले, जि.प.अंतर्गत पट्टे वाटप झाले नाही, रोजगार नाही, नळयोजना, ज्येष्ठ नागरिकांना संजय गांधी योजनेचे पैसे मिळाले नाही, रेशन दुकानात माल नाही, अशा स्वरूपाची निवेदने नागरिकांनी आज दिलीत. प्रत्येकाने पालकमंत्र्यांना भेटून ही निवेदने दिली असून नागरिकांच्या मागणीनुसार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आपला प्रयत्न असल्याचे पालकमंत्र्यांनी नागरिकांना सांगितले

या शिवाय नवीन मोठ्या कामांचे प्रस्ताव शासनाकडे सादर करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. त्यासाठी निधीची मागणी शासनाकडे करून त्यावर पाठपुरावा करण्यत येणार आहे. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पालकमंत्री नागरिकांना भेट होते.