नागपू :कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता, इतर सण समारंभाप्रमाणेच यंदाचा मोहरम सण मुस्लीम बांधवांनी साध्या पध्दतीने साजरा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले आहे.
राज्यात तसेच नागपूर जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव व प्रसार झपाट्याने होत आहे. याला आळा घालण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा व आपत्ती प्रतिबंधक अधिनियम लागू करण्यात आला आहे. यासाठी मोहरम सण साधेपणाने साजरा करावा.
केंद्र व राज्य शासनाकडून सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांना बंदी असल्यामुळे सार्वजनिक मातम/मिरवणूक काढू नये. खाजगी मातम देखील शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करुन घरीच करावेत. वस्तीमध्ये देखील एकत्रित मातम / दुखवटा करु नये. वाझ/मझलीस हे कार्यक्रम शासनांच्या नियमांचे पालन करुन ऑनलाईन पध्दतीन आयोजित करावे. ताजिया/ आलम घरीच अथवा घराशेजारी बसवून तेथेच विसर्जन करावे. सबील-छबील बांधण्यासाठी प्रशासनाची परवानगी घ्यावी. सबीलच्या ठिकाणी स्वच्छता राखून भौतिक अंतराचे पालन करावे. कोणत्याही कार्यक्रमात चारपेक्षा अधिक व्यक्तींनी उपस्थित राहू नये. कोविडची परिस्थिती लक्षात घेता रक्तदान, प्लाज्मा, आरोग्य शिबीरे असे सामाजिक उपक्रम राबवावेत. या उपक्रमांध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करावी.
वरील मार्गदर्शक सुचनांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच भारतीय दंड संहिताअंतर्गत दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. असे आवाहन करण्यात आले आहे.