
नागपूर : वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झालेला १४ वर्षीय मुलगा अखेर सुरक्षित अवस्थेत सापडल्याने कुटुंबीयांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. १८ मार्च २०२६ रोजी सकाळच्या सुमारास वडिलांच्या रागामुळे घरातून बाहेर पडलेला हा मुलगा काही तासांपर्यंत घरी परत न आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
मुलगा परत न आल्याने नातेवाईकांनी आणि कुटुंबीयांनी परिसरात तसेच मित्रपरिवारात शोध घेतला; मात्र काहीच ठावठिकाणा लागला नाही. त्यामुळे अखेर वाठोडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक हरीश कुमार बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तत्काळ शोधमोहीम सुरू केली. विविध पथके तयार करून संपूर्ण परिसरात तपास सुरू करण्यात आला.
तपासादरम्यान मुलगा रागाच्या भरात घर सोडून कामाच्या शोधात भटकत असल्याची माहिती समोर आली. या धाग्यावरून पोलिसांनी शोधमोहीम अधिक तीव्र करत चैतन्येश्वर नगर परिसरात मुलाला शोधून काढले.
पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन सुरक्षितपणे कुटुंबीयांकडे सुपूर्द केले. प्राथमिक चौकशीत मुलासोबत कोणतीही गैरप्रकाराची घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले असून, त्याने केवळ रागातून घर सोडल्याची कबुली दिली आहे.
दरम्यान, या प्रकरणी वाठोडा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १६५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहितेच्या कलम १३७ (२) नुसार नोंद करण्यात आली होती. संबंधित मुलगा चैतन्य रितेश संगेवार (वय १४) हा सुखरूप मिळून आल्याची अधिकृत माहिती पोलिसांनी दिली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.








