
मुंबई : राज्यातील वाढत्या मानव-बिबट्या संघर्षाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील विविध भागांतून पकडलेल्या सुमारे ५० बिबट्यांना गुजरातमधील जामनगर येथील वनतारा या अत्याधुनिक वन्यजीव बचाव व पुनर्वसन केंद्रात पाठवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या निर्णयामुळे मानवांचे संरक्षण तर होईलच, पण पकडलेल्या बिबट्यांना आधुनिक वैद्यकीय सुविधा, सुरक्षित वातावरण आणि योग्य संवर्धनही मिळणार आहे.
राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या जवळच्या सूत्रांनी शुक्रवारी या निर्णयाला दुजोरा दिला. वनताराच्या व्यवस्थापनाशी झालेल्या चर्चेनंतर या बिबट्यांच्या स्थलांतरावर तत्त्वत: सहमती झाल्याची माहिती समोर आली आहे.
गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये बिबट्यांच्या हालचाली वाढल्या आहेत. विशेषतः जुन्नर, नाशिक आणि अहमदनगर या भागांमध्ये नोव्हेंबर-डिसेंबरदरम्यान बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना वाढल्यामुळे स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वन विभागाने अनेक बिबटे पकडले असले तरी त्यांना ठेवण्यासाठी राज्यात पुरेशा सुविधा आणि जागेचा अभाव असल्याचेही सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर जामनगरमधील रिलायन्स फाउंडेशनच्या वनतारा केंद्रात अत्याधुनिक उपचार, पुनर्वसन आणि संवर्धन सुविधा उपलब्ध असल्याने हा पर्याय निवडण्यात आला आहे.
दरम्यान, या निर्णयामुळे मानव-वन्यजीव संघर्ष कमी होण्यास मदत होईल, तसेच बिबट्यांचे संरक्षण आणि संवर्धन अधिक प्रभावीपणे करता येईल, अशी अपेक्षा वन विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.








