नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान शहरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे नागरिक नगरसेवकांकडे समस्या घेऊन येत आहे. त्यावर करावयाच्या उपाययोजनासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी (ता. ३) पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
बैठकीला महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा उपस्थित होते. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांनी घरीच राहावे यासाठी प्रशासनाने किराणा, भाजीपाला, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळावे, याची व्यवस्था केली आहे. मात्र तरीही नागरिक समस्या घेऊन नगरसेवकांकडे जात आहेत. नगरसेवकांनी त्यांच्या समस्येचे समाधान करावे आणि त्यांना घरी राहणे का गरजेचे आहे, याबाबत सांगावे, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
नागपूर शहरातील कुण्याही नागरिकाला लॉकडाऊनदरम्यान त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन कार्यरत असून संपूर्ण नगरसेवकांनी व्यवस्थेला सहकार्य करावयाचे आहे. जिथे कुठे अडचण येत असेल तेथे सरळ महापौर, पदाधिकारी किंवा अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.