मनपा-ग्रीन व्हिजीलची ‘पोर्णिमा दिवसा’निमित्ताने जनजागृती मोहीम
नागपूर : नागरिकांसाठी आज गरजेची बनलेल्या विजेची आज बचत केली नाही तर भविष्यात विजेची मोठी तूट पडेल. नागरिकांना वीज बचतीचे महत्त्व कळावे यासाठी नागपूर महानगरपालिकेने ग्रीन व्हिजीलच्या सहकार्याने काही वर्षांपूर्वीपासून सुरू केलेल्या पोर्णिमा दिवसाचे आयोजन शुक्रवारी (ता. २१) मेहाडिया चौकात करण्यात आले. येथील व्यापाऱ्यांमध्ये वीज बचतीचा जागर करत मनपा कर्मचारी आणि ग्रीन व्हिजीलच्या स्वयंसेवकांनी वीज बचतीसाठी नागरिकांना उद्युक्त केले.
तत्कालिन महापौर आमदार प्रा. अनिल सोले यांच्या प्रेरणेने प्रत्येक पोर्णिमेच्या उजेड्या रात्री ‘पोर्णिमा दिवस’ हा उपक्रम राबविण्यात येतो. उपक्रमाचा शुभारंभ झाला तेव्हापासून या उपक्रमात सातत्य असून आजपर्यंत या उपक्रमातून लाखो यूनीट विजेची बचत झाली आहे.
२१ डिसेंबर रोजी मेहाडिया चौकात ‘पोर्णिमा दिवसा’चे आयोजन करण्यात आले होते. ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तभ चैटर्जी आणि कार्यकारी अभियंता संजय जयस्वाल यांच्या नेतृत्त्वात स्वयंसेवकांनी अनावश्यक वीज दिवे एक तासाकरिता बंद करण्याचे आवाहन केले. प्रत्येक प्रतिष्ठानांमध्ये जाऊन रात्री ८ ते ९ या काळात किमान एक तासासाठी अनावश्यक विद्युत दिवे बंद ठेवण्याचे आवाहन केले.
त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत व्यापाऱ्यांनी अनावश्यक विद्युत दिवे बंद केले आणि वीज बचतीच्या मोहिमेत आपला सहभाग नोंदविला. इतकेच नव्हे तर यापुढे पोर्णिमा दिवस आणि अन्य दिवशीही अनावश्यक वीज दिवे बंद ठेवून शक्य तेवढी वीज बचत करण्याचे आश्वासन दिले.
मनपाच्या वतीनेही परिसरातील अनावश्यक पथदिवे बंद करण्यात आले होते. ग्रीन व्हिजीलचे स्वयंसेवक सुरभी जयस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, शीतल चौधरी, बिष्णुदेव यादव यांच्यासह मनपाचे सहायक अभियंता ए. एस. मानकर, धरमपेठ झोनचे उपअभियंता एम.एम. बेग, कनिष्ठ अभियंता जी. एम. तारापुरे, कनिष्ठ अभियंता डी. वी. वंजारी, सुनील नागदेवते, प्रशांत कालबेंडे सहभागी झाले मेहाडिया चौकातील उपक्रमात सहभागी झाले होते.