मुंबई: गेल्या काही दिवसांपासून रेल्वे रूळांवर घातपाताच्या अनेक घटना समोर आल्या असून आता कानपूर आणि भोपाळ रेल्वेकांडानंतर महाराष्ट्रातल्या रेल्वे रुळांवर देखील घातपात होण्याची शक्यता महाराष्ट्र पोलिसांनी वर्तवली आहे. महाराष्ट्र पोलीसांनी रेल्वेला पत्र लिहून सुरक्षा वाढविण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर राज्यात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
गुप्तचर यंत्रणांच्या मते दहशतवतवादी संघटना एक मोठा घातपात घडवण्याच्या तयारीत आहेत. भिकारी किंवा विक्रेत्यांच्या वेशात दहशतवादी घातपात घडवू शकतात, अशीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा खळबळून जागी झाली आहे.
रेल्वे विभागाने यासंदर्भात महाराष्ट्र पोलिसांना पत्र लिहून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. यात रेल्वे स्टेशन आणि ट्रकवर पेट्रोलिंग वाढवण्याच्या तसंच भिकारी, विक्रेत्यांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
काही दिवसांपूर्वीच मुंबई आणि आसपासच्या परिसरात रेल्वे ट्रॅकवर सामान किंवा दगड ठेवल्याचे प्रकार उघड झाले होते. या घातपातांमध्ये दहशतवादी संघटनांचे हात असल्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. त्यानंतर आता थेट गुप्तचर विभागानंच घातापाताची शक्यता वर्तवली आहे.